Vijay Wadettiwar : शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही; विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

नागपूर : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, अद्यापही कोणता मंत्री, नेता, आमदार यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. यांना केवळ राजकारण करायचे आहे. यांना केवळ सत्ता आणि खुर्ची महत्त्वाची आहे. काल मी विखे पाटील पाहिले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करायला पाहिजे.
अवेळी पाऊस वगैरे हे एनडीआरएफच्या निकषात बसत नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो. पण राज्य सरकार म्हणून एचडीआरएफचे निकष आहेत त्याप्रमाणे त्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नका. आम्ही हे करतो, ते करतो म्हणत बसू नका. नाहीतर शेतकरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
हे केवळ हिंदू मुस्लिम करत राहतात
वडेट्टवार म्हणाले, थोडी देखील शेतकऱ्यांची कीव नाही यांना. एवढे मोठे संकट आलेले असताना सुद्धा त्यांना मदतीची घोषणा नाही. थातुरमातूर पंचनामे केले जात आहेत. धान उत्पादक शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. रग्बी पिकाचे सर्व धान अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाहीत. त्यांना परवानगी नाही. आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सरकारला काहीच दिसत नाही. हे केवळ हिंदू मुस्लिम करत राहतात आणि जनता गेली खड्ड्यात. याच्या पलीकडे यांना काही देणे-घेणे नाही. हिंदू मुस्लिम करून यांना मते मिळतात, असेही ते म्हणाले.





