Viashnavi Hagvane : “महिला आयोगाने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही…”; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान, थेट म्हणाल्या

Viashnavi Hagvane case | Mayuri Jagtap | Pankaja munde : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून शुक्रवारी (३० मे) अटक केली. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या आरोपाखाली तो गेल्या आठवड्याभरापासून फरार होता. पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांची एकूण सात पथके त्याचा शोध घेत होती.
वैष्णवी हगवणे (वय २४) हिने १६ मे रोजी भुकूम येथील सासरच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक, सासू लता, दीर सुषील, जाऊ करिश्मा आणि सासरे, माजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ” वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक पाऊल उचलणं गरजेचं आहे. या प्रकरणाबाबतचा सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील’ असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. तर तक्रार कुठलीही असली तरी महिला आयोगाने दखल घेणं क्रमप्राप्त आहे, असंही यावेळी बोलताना मुंडे यांनी म्हंटलं आहे.
वैष्णवी हगवणेने सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींची अनेक प्रकरणे उघड झाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर राज्यभरतून संताप व्यक्त केला जात आहे. तर वैष्णवीच्या मोठ्या जावेने राज्य महिला आयोगाकडे स्वत:वर होणाऱ्या छळची तक्रार देखील केली होती. मात्र त्यावर कोणतीही दखल महिला आयोगाने घेतलेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली चाकणकर यांनी यावेळी दखल का घेतली नाही?
या पत्रात मयूरी हिला हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. ‘तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये’ या भाषेत मुलीला शिवीगाळ करण्यात आल्याचे मयूरीच्या आईने पत्रात सांगितले आहे. मात्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी दखल का घेतली नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जर वेळीच हगवणे कुटूंबियाबाबत अॅक्शन घेतली गेली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता, अशी हळहळ अनेकांकडून केली जात आहे.
नेमकं काय म्हटलं होतं पत्रात?
प्रति,
अध्यक्षा,
महाराष्ट्र राज्य महिला आयोग
महाराष्ट्र राज्य, मुंबई
विषय : आमच्या मुलीस तिच्या सासरवाडीतुन होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देणे बाबत.
अर्जदार : श्रीमती. लता राजेंद्र जगताप (आई)
कु. मेघराज राजेंद्र जगताप (भाऊ)
महोदय,
माझी मुलगी सौ. मथुरी सुशील हरवणे हीचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फ़ॉच्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे, असा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करूण तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे व दीर शशांक राजेंद्र हगवणे व नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण करुन तिला धमकी दिली.
तुला वडिल नाहीत, तुझ्या अपंग भावास व आईला आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे. अशा धमक्या देऊन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा आम्ही घरघुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो. त्यानंतर 18/02/2024 रोजी पौंड पोलिस स्टेशन ता, मुळशी येथे तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी समाज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते.
दि. 06/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकोर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा मोबाईल हिसकाऊन पळ काढला मुलगी मोबाईलसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलागू करत होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डसुद्धा झाली आहे.
तिच्याकडे कोणालाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीमध्ये ती पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती. याचा फायदा घेत तिची सासू व नणंद यांनी यांनी पोलिस स्टेशनला मुलीची तक्रार दिली. व इतर अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमूद करता येऊ शकत नाही. आमची विनंती आहे की, आमच्या अर्जाची तत्काळ दखल घ्यावी व आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण देऊन आमच्या मुलीस न्याथ घावा, ही नम्र विनंती, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.





