मुंबई : ‘मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी महायुती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. परंतु प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे,’ असे काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ‘नालेसफाई असो वा रस्ते काँक्रीटीकरणाची कामे या सर्वात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करा आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा,’ अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी शनिवारी चेंबूर येथील श्रमजीवी नगर, वत्सलाताई नाईक नगर आणि कुर्ला येथील क्रांतीनगर, साबळेनगर परिसरातील महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. ‘सत्ताधाऱ्यांनी नालेसफाईची कामे जोमात सुरू असल्याचा दावा केला असला तरी, अनेक भागांत नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत तसेच अन्य ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजूनही तसाच पडून आहे. त्यामुळे यंदाही मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या बेजबाबदार, भ्रष्ट कारभाराचा फटका पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना बसणार आहे. सत्तेतील मंडळी भ्रष्टाचाराचा ‘मेवा’ खात बसली असून मुंबईकर मात्र यातना भोगत आहे,’ असे त्या म्हणाल्या. या पाहणीत नालेसफाईच्या कामांमध्ये दिरंगाई आणि अनेक त्रुटी आढळल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘या त्रुटी त्वरित दुरुस्त कराव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू. ज्या भागांत नालेसफाई अद्याप झाली नाही, ती तत्काळ पूर्ण करावी सत्ताधाऱ्यांनी आणि महापालिकेने आपल्या कंत्राटदार मित्रांची गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांना वेठीस धरू नये,’ असे त्या म्हणाल्या.