माधव विद्वांस
पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे आज पुण्यस्मरण. ते राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म 9 एप्रिल 1887 रोजी मुंबईमधील फणसवाडीमधील एका चाळीत झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.
त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील प्रभू सेमिनरी शाळा, रॉबर्टमनी विद्यालय व विल्सन हायस्कूल येथे इंग्रजी पाचवीपर्यंत झाले. त्यांचे वडीलबंधूंना पुण्यात नोकरी मिळाली व त्यांच्याबरोबर ते पुण्यात आले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता.
तसेच लहानपणी गरिबीत आयुष्य काढल्याने विद्यार्थ्यांच्या हालआपेष्टांची जाणीव होती. त्यामुळे राष्ट्रासाठी व विद्यार्थ्यांसाठी आपले जीवन व्यतीत करायचे त्यांनी ठरविले. त्यानंतर ते वर्ष 1906 मध्ये दादासाहेब खापर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार विदर्भात यवतमाळ येथे गेले. त्या काळात सरकार विरुद्ध प्रजा असा संघर्ष सुरू होता.वंगभंगाच्या चळवळीतून राष्ट्रीय शिक्षण देणारी विद्यालये व मोठमोठ्या पाठशाळा निर्माण झाल्या.
विलायती मालाप्रमाणेच इंग्रज सरकारच्या मदतीने चाललेल्या शिक्षणसंस्थांवरही लोकांनी बहिष्कार घातला होता.यातूनच तळेगाव, अमरावती व यवतमाळ येथे राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या. दादासाहेब यवतमाळ येथील “विद्यागृह’ शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करू लागले. दर रविवारी दादासाहेब व त्यांचे विद्यार्थी शाळेसाठी मदत गोळा करीत असत.
यवतमाळ येथील पृथ्वीगीर दस्तगीर यांनी राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करणारे “हरिकिशोर’ हे वृत्तपत्र सुरू केले होते. दस्तगीर यांना व त्यांच्या नंतरचे संपादक नरहर विष्णू भावे यांना देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली. तेव्हा दादांनी “हरिकिशोर’च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. यवतमाळ येथील विद्यागृह व हरिकिशोर वृत्तपत्रावर सरकार बंदी आणणार असल्याची चाहूल लागताच ती संस्था बंद करून संस्थाचालक पुण्या-मुंबईकडे गेले.
त्यावेळी दादासाहेब पुण्याला आले. काही दिवस त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. नंतर ते नुकत्याच स्थापन झालेल्या पुणे अनाथ विद्यार्थीगृहात दाखल झाले.त्यावेळी संस्था आर्थिक अडचणीतून जात होती. विद्यार्थ्यांचे दैनंदिन भोजन व इतर आवश्यक गोष्टींचा खर्च भागविण्यासाठी ते व त्यांचे सहकारी रा. ज. पटवर्धन पुण्यात फिरून मदत गोळा करीत असत.
कालांतराने संस्था मोठी होऊ लागली व संस्थेने 1914 मध्ये “अनाथ विद्यार्थी गृह पाठशाला’ हा उपक्रम सुरू केला. चिंचवड येथे संस्थेची शाखा सुरू झाली. वर्ष 1920 मध्ये संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. ग. श्री. खैर व ना. वि. ऊर्फ मामा पेंडसे आजीव सदस्य झाले. डॉ. खैर व डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी संस्थेमार्फत दादांच्या समवेत औद्योगिक शिक्षणाची सोय असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाची स्थापना केली.
त्यांच्या कार्याकडे व प्रयत्नांकडे पाहून देणग्यांचा ओघ सुरू झाला. संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संस्थेचा छापखाना काढण्याची दादांना कल्पना सुचली व शं. रा. तथा मामा दाते त्यांच्या लोकसंग्रह छापखान्यासह संस्थेत आले. त्यातून संस्थेस उत्पन्न मिळू लागले. 16 ऑक्टोबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले. अभिवादन.