प्रभाकर तुमकर Vadgaon Maval : मावळ तालुक्याच्या राजकारणात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून, त्या अनेक नेत्यांच्या राजकीय वाटचालीची पायरी ठरल्या आहेत. १९६१ च्या कायद्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना झाली आणि १९६२ मध्ये पहिली निवडणूक झाली. काल पार पडलेली निवडणूक ही या दीर्घ प्रवासातील ११ वी निवडणूक ठरली आणि तिने पुन्हा एकदा इतिहासाची पाने उलटवली. मावळच्या मतदारांनी ज्या पक्षावर विश्वास टाकला त्याला भरभरुन मतदान केले. अनेक वर्षे निर्विवाद बहुमत दिले. परंतु त्यानंतर दुसऱ्या पक्षांनाही तशीच संधी दिली. मावळच्या राजकीय इतिहासाची सुरुवात काॅंग्रेसच्या वर्चस्वापासून होते. राज्यात आणि देशात त्याकाळी जास्त सत्तेत नसलेल्या भाजपलाही मावळने २५ वर्ष राज्य करण्याची संधी दिली. एवढेच नव्हे तर जनसंघाचाही मावळनेच चंचूप्रवेश घडवून आणला. काॅंग्रेस आणि भाजपला सलग पाच-पाच निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत देणाऱ्या मावळच्या जनतेने यंदा पंचायत समिती आणि मावळातील जिल्हा परिषद गट भाजप आणि काॅंग्रेस मुक्त करुन टाकले आहेत. १९६२ ते १९७९ : काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व” मावळ तालुक्यात सुरुवातीला ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समिती गण अशा एकूण ९ जागा होत्या. १९६२ आणि १९६७ या पहिल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सर्व ९ जागांवर पूर्ण बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली. त्या काळात काँग्रेसला कोणताही प्रभावी विरोधी पक्ष नव्हता. १९७२ : जनसंघाचे पहिले खाते १९७२ मध्ये मावळच्या राजकारणात पहिल्यांदा वेगळा रंग दिसला. तत्कालीन जनसंघाने प्रथमच खाते उघडले. तळेगावचे विठ्ठल उर्फ बबनराव खांडगे हे मंगरूळ गावात नाव नोंदवून, आंदर मावळ मतदारसंघातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, मध्यंतरी त्यांचे पद गेले आणि झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे मारुतराव गाडे निवडून आले. १९७९ : सत्ता टिकली, पण विरोधकांचा प्रवेश १९७९ च्या निवडणुकीतही काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. मात्र, ९ पैकी एकमेव जागा जनसंघाने जिंकली. परंतु हा केवळ एका जागेवरील विजय नव्हता तर मावळच्या राजकारणात जनसंघाने खऱ्या अर्थाने केलेला चंचूप्रवेश होता. येथूनच जनसंघाची आणि पुढे भाजपची पाळे-मुळे घट्ट होण्यास सुरुवात झाली. नवलाख उंबरे गावचे बाजीराव शेटे हे पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. पहिल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ता राखली, पण विरोधकांची पाळेमुळेही रुजत होती. भाजप सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचले तब्बल पाच निवडणुकांमध्ये केवळ संघर्ष करत असलेल्या भाजपला ९० च्या दशकात मावळच्या जनतेने सत्तेपर्यंत पोहचविले. त्यानंतर तब्बल पाच निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देत सत्ता सोपविली. परंतु आता पुन्हा मावळचे मन बदलले असून भाजपला सत्तेपासूनच नव्हे तर पंचायत समिती भवनापासूनही दूर लोटले आहे. सभापती-उपसभापतींचा विक्रमांचा काळ मावळ पंचायत समितीच्या इतिहासात आतापर्यंत २४ सभापती आणि २१ उपसभापती झाले आहेत. * रघुनाथ दादा सातकर – ११ वर्ष सभापती, ५ वर्ष उपसभापती * आण्णासाहेब ढमाले – सलग १२ वर्ष उपसभापती * रघुनाथ दादा सातकर व आण्णासाहेब ढमाले – सलग २३ वर्ष जिल्हा परिषद सदस्य हे विक्रम आजही मावळच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतात. सत्तांतरांची समसमान लढत आतापर्यंत झालेल्या १० निवडणुकांमध्ये * ५ वेळा काँग्रेसला बहुमत * ५ वेळा भारतीय जनता पक्षाचा विजय * राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुवात काॅंग्रेस-भाजप शून्यावर म्हणजेच मावळचा मतदार कायमच जागरूक राहिला, सत्ता बदलत ठेवत राहिला. जिल्हा पातळीवर पदांची दुर्मीळ संधी ६३ वर्षांच्या इतिहासात मावळला फक्त तीन वेळा जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे मिळाली— * १९९७ – स्व. दिलीप टाटिया (बांधकाम समिती) * २०१४ – आतिश परदेशी (समाज कल्याण समिती) * २०२० – बाबुराव वायकर (कृषी व पशुसंवर्धन समिती) ११ वर्षांचा अभूतपूर्व कार्यकाळ १९७९ चा जिल्हा परिषद कार्यकाळ तब्बल ११ वर्षे सलग चालला. त्या काळात कमिटी (बॉडी) बरखास्त झाली नाही. कारण तेव्हा राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात नव्हता. १९९२ मध्ये राज्य निवडणूक आयोग स्थापन झाला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारच घेत होते; फक्त केंद्रीय निवडणूक आयोग अस्तित्वात होता. जिल्हा परिषद ते विधानसभेपर्यंतचा प्रवास मावळने अनेक आमदार घडवले— * १९६७ – उपसभापती असताना रघुनाथ दादा सातकर आमदार * १९७९–१९८६– सभापती असतानाच मदन बाफना आमदार * १९९५ – उपसभापती रूपलेखाताई ढोरे आमदार रघुनाथ दादा सातकर, मदन बाफना, रूपलेखाताई ढोरे आणि दिगंबर दादा भेगडे —हे चार जिल्हा परिषद सदस्य पुढे आमदार झाले. स्वीकृत सदस्यांची परंपरा १९६२ ते १९९५ या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीत स्वीकृत सदस्य पदाची तरतूद होती. या माध्यमातून दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिवंगत केशवराव वाडेकर, शंकरराव शेलार, स्व. गंगाधर बवरे, भरत शिंदे आदींनी काम केले. २०२६ : इतिहासाला नवे वळण ज्या मावळने सुरुवातीला काँग्रेसला सर्व जागा दिल्या, त्याच मावळने २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व जागांवर विजय देत ‘क्लीन स्वीप’ घडवून आणला. हा निकाल केवळ निवडणूक विजय नाही, तर मावळच्या ६३ वर्षांच्या राजकीय इतिहासातील नवा अध्याय ठरतो. Pune District : उत्रौलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सपाट; संग्राम थोपटे यांच्या संघटन कौशल्याचा विजय, शिवतरे यांच्या विरोधात कौल