Uttar Pradesh Election : उत्तरप्रदेशात इंडिया आघाडीचा लागणार कस; महाराष्ट्राच्या रणसंग्रामावेळी विधानसभेच्या १० जागांसाठी पोटनिवडणूक शक्य

Uttar Pradesh Election : उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या १० जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्राच्या रणसंग्रामावेळी पोटनिवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. त्या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा राजकीय कस लागेल.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने उत्तरप्रदेशात अनपेक्षितपणे मुसंडी मारत भाजपची घोडदौड रोखली. विरोधकांची ती कामगिरी भाजपला यावेळी स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखण्यात कळीची ठरली. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक ८० जागा आहेत.
त्यातील तब्बल ४३ जागा इंडियाने जिंकल्या. त्या आघाडीचे घटक असणाऱ्या समाजवादी पक्षाने (सप) ३७, तर कॉंग्रेसने ६ जागा हस्तगत केल्या. त्यामुळे भाजपचे उत्तरप्रदेशातील संख्याबळ (३३ जागा) मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने घटले.
लोकसभा निवडणुकीतील त्या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे मोठे आव्हान उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीपुढे असेल. मुळात ती आघाडी पोटनिवडणुकीत शाबूत राहणार का याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. वरवर पाहता आघाडी कायम राहण्याची ग्वाही सप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष देत आहेत.
मात्र, पोटनिवडणुकीतील जागावाटपावरून त्यांच्यात सहमती होणार का असा प्रश्न तूर्त तरी पुढे आला आहे. त्याचे कारण म्हणजे कॉंग्रेसने पोटनिवडणुकीत निम्म्या म्हणजे ५ जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तो प्रस्ताव सपला मान्य होण्याची बिल्कूल शक्यता नसल्याचे मानले जाते. त्याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेशात कॉंग्रेसपेक्षा सपची ताकद कितीतरी अधिक आहे. त्याशिवाय, पोटनिवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या जागांपैकी एकही जागा याआधी कॉंग्रेसकडे नव्हती.
लोकसभा निवडणुकीत ९ आमदारांचा विजय झाल्याने त्यांच्या विधानसभा जागा रिक्त झाल्या. त्याशिवाय, सपचा आमदार अपात्र ठरल्याने आणखी १ जागा रिक्त झाली. एकूण रिक्त १० जागांपैकी ५ सपकडे, तर ४ भाजपकडे होत्या. उर्वरित जागा आता भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या रालोदकडे होती.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचे सत्र पुढे कायम ठेवायचे असेल तर सप आणि कॉंग्रेसला एकदिलाने लढावे लागेल. ते घडणार का ते आगामी काळात समोर येईल.





