कॉंग्रेसने साधला सरकारवर निशाणा
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदम्बरम यांना आर्थिक फेरफार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेच्या विरोधात सध्या कॉंग्रेस आक्रमक झाली असून भाजपाने सीबीआय आणि ईडीचा राजनैतिक फायद्यासाठी वापर केला आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. तब्बल 27 तासांच्या नाट्यानंतर चिदम्बरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर कॉंग्रेसने आज पत्रकार परिषद घेत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेत पी.चिदंबरम यांची अटक ही लोकशाहीची हत्या आहे. देशाची अर्थव्यवस्था अतिशय खराब आहे. यावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा काम करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. तसेच मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या जबाबावर 40 वर्ष देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. एवढेच नाही तर सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये वित्त मंत्रालयातील आधिकाऱ्यांची नावे आहेत. चिदम्बरम किंवा त्यांचे मुलाचे नाव नव्हते. आतापर्यंत या प्रकरणाची चार्जशीट दाखल करण्यात आलेली नसल्याचा दावा देखील कॉंग्रेसने केला आहे. भाजपा चुकीच्या उद्देशाने प्रचार करण्यात व्यस्त आहे. त्यांचा हा अजेंडा पुर्णपणे चुकीचा असून 12 वर्ष जुन्या केसमध्ये अटकेचा अर्थ काय ? मागील पाच वर्षात भाजपा पुरावा गोळा करण्यात अपयशी ठरले असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. देशात सुरू असणाऱ्या मंदीवर उपाय शोधण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. लाखो लोकांचे रोजगार जात आहेत. रूपयाची किंमत घसरली आहे. यावरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने मागील दोन दिवसांत चिदंबरम यांच्या अटकेचा ड्रामा करत असल्याचा आरोपदेखील कॉंग्रेसने केला.