Uruli Kanchan Police: उरुळी कांचन पोलिसांची कमाल! आठवडे बाजारात हरवलेली २ वर्षांची चिमुकली ३० मिनिटांत शोधली
Uruli Kanchan Police: हवालदार निलेश जाधव, दत्तात्रय गाडेकर आणि सारिका गवारे यांची उल्लेखनीय कामगिरी; मुलीला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू.

Uruli Kanchan Police – उरुळी कांचन येथील रविवारी भरलेल्या गर्दीच्या आठवडे बाजारातून हरवलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा उरुळी कांचन पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटांत शोध लावून तिला सुखरूपपणे आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. रविवारी (दि. 14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात मोठी गर्दी होती.
याच गर्दीत नेहा महेंद्र चौधरी (वय 2, रा. डाळिंब, ता. दौंड) ही चिमुकली आपल्या आई-वडिलांपासून ताटातूट होऊन हरवली. घाबरलेली आणि रडणारी ही मुलगी बाजार परिसरात एकटीच फिरत होती. खरेदीसाठी आलेल्या एका जागरूक महिलेच्या निदर्शनास ही बाब आली. मुलगी हरवलेली असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न लावता तिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलगी केवळ दोन वर्षांची असल्याने तिला स्वतःचे नाव, पत्ता किंवा पालकांचा संपर्क क्रमांक सांगता येत नव्हता.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सोशल मीडियाचा, विशेषतः व्हॉट्सप समूहांचा वापर करून मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. तसेच पोलीस कर्मचार्यांनी बाजार परिसरात प्रत्यक्ष शोधकार्य सुरू केले.पोलिसांच्या या प्रयत्नांना अवघ्या अर्ध्या तासात यश आले. सोशल मीडियावरील संदेश आणि शोधमोहीमेमुळे मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आई-वडिलांचा संपर्क पोलिसांना मिळाला.
मुलगी सुरक्षित असल्याचे समजताच आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आवश्यक खातरजमा करून पोलिसांनी नेहा हिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस हवालदार निलेश जाधव, दत्तात्रय गाडेकर आणि पोलीस शिपाई सारिका गवारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.




