UPSC Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला. एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून या निकालात महाराष्ट्रातील उमेदवारांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक, राजेश्वरी सुवे एम. यांनी द्वितीय, तर आकांश धुल्ल यांनी तृतीय स्थान पटकावले आहे. पहिल्या १०० मध्ये महाराष्ट्राचे चार उमेदवार – निकालातील पहिल्या १०० क्रमांकांत महाराष्ट्र राज्यातील चार उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. किरण कामठे यांनी ५३ वा, हृषिकेश अलासे यांनी ६१ वा, सायली पगार यांनी ८७ वा, तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे. इतर मराठी उमेदवारांची कामगिरी – पहिल्या ५०० मध्ये स्थान मिळवलेल्या इतर महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये अंकिता पाटील (१४०), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२५), शुभम बेहेरे (२२६), ऋषिकेश पालीमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९) आणि मनोज पाटील (४९३) यांचा समावेश आहे. तसेच ही यादी अपडेट होत आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या मुख्यपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. हेही वाचा – यूपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम, पाहा यादी कोणत्या सेवेसाठी किती जागा? शिफारस केलेल्या ९५८ उमेदवारांपैकी IAS साठी १८०, IPS साठी १५०, IFS साठी ५५, केंद्रीय सेवा गट-अ साठी ५०७ तर गट-ब साठी १९५ जागा उपलब्ध आहेत. मात्र अंतिम नियुक्त्या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असतील. ३४८ उमेदवारांची शिफारस तात्पुरती – जाहीर निकालात ३४८ उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपात असून २ उमेदवारांचे निकाल रोखून ठेवण्यात आले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांनी केलेल्या आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद आहे.