UPSC Final Result 2026 – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात राजस्थानच्या डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची शिफारस केली असून, त्यामध्ये राज्यातील सुमारे ५० हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा टप्पा पार पाडल्यानंतर, पात्र उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. त्यानंतर जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत राजेश्वरी सुवे एम. यांनी द्वितीय, तर आकाश धुल्ल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे. आयोगाने ९५८ उमेदवारांची शिफारस केली असली, तरी अंतिम नियुक्ती ही केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असेल. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) १८०, भारतीय परराष्ट्र सेवेसाठी (आयएफएस) ५५, भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) १५०, तर केंद्रीय सेवा गट ‘अ’ साठी ५०७ आणि गट ‘ब’ साठी १९५ पदे उपलब्ध आहेत. दरम्यान, ३४८ उमेदवारांची शिफारस सध्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, २ उमेदवारांचे निकाल तांत्रिक कारणास्तव राखून ठेवण्यात आले आहेत. यशस्वी उमेदवारांच्या आरक्षणाच्या दाव्यांची अंतिम पडताळणी संबंधित प्राधिकरणांकडून केली जाणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील गुणवंतांचा झंझावात निकालातील पहिल्या १०० क्रमांकांत महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपले स्थान निश्चित केले आहे. किरण कामठे (५३ वा), हृषिकेश अलासे (६१ वा), सायली पगार (८७ वा) आणि दीक्षा पाटकर (८८ वा) या उमेदवारांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवून राज्याची मान उंचावली आहे. याव्यतिरिक्त अंकिता पाटील (१४०), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२५), शुभम बेहेरे (२२६), ऋषिकेश पालीमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९) आणि मनोज पाटील (४९३) यांसह अनेक उमेदवारांनी यश संपादन केले आहे.