राजधानीत अवकाळीचा हाहाकार.! वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली, दहा जणांचा मृत्यू

Delhi Weather – दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली, उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसासोबत जोरदार वादळीवाऱ्यामुळे झाडे पडण्याचे तसेच घरांचे छप्पर पडण्याच्या घटना दिल्लीत घडल्या आहेत.
अशाच एका घटनेत, दिल्लीतील जफरपूर कला भागात एका घरावर झाड पडून या अपघातात ३ मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, दिल्लीतील छावाला येथे एका घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
आज झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. ज्यामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अर्धी चाके पाण्यात बुडलेली दिसत आहेत. खरंतर, हवामान खात्याने दिल्लीच्या हवामानातील बदलाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने सांगितले होते की, गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. गुरुवारी (१ मे) रात्री दिल्लीत पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी (२ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात जोरदार वारे वाहू लागले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रगती मैदानात ताशी ७८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दिल्लीतील विविध भागात पाणी साचलेले पहायला मिळाले.
आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील द्वारका येथील खारखरी कालवा गावात जोरदार वाऱ्यामुळे ट्यूबवेल रूमवर एक कडुलिंबाचे झाड पडले. या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला, तर महिलेचा पती जखमी झाला आहे.
दरम्यान, वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत झाली. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली. तर 100 हून अधिक विमान सेवेला विलंब झाला. तसेच पुढील दोन दिवस हे पावसाचे असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवस विमानसेवा प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यालाही दिला अलर्ट !
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहे. यामुळे पुढील चार दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेच्या दाबाचा पट्टा विदर्भातून जात असल्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने राजस्थानच्या ३० जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे गारपीट होऊ शकते. तर राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये धुळीचे वादळ येईल.





