दुर्दैवी ! आईच्या मृत्यूची बातमी समजताच मुलगा घाईत निघाला अन् काळाने घाला घातला; १२ तासाच्या आतच आई-मुलाचा मृत्यू

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या रेवामधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच मुलगा आईकडे निघाला पण काळाने त्याच्यावर पण घाला घातला असल्याचे पाहायला मिळाले.आईच्या मृत्यूनंतर फक्त 12 तासांच्या आतच मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईचा रेवा जिल्ह्यात दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला, तर आईच्या अंत्यविधीसाठी इंदुरहून निघालेला मुलगाही अपघातात ठार झाला आहे. राणी देवी असे अपघातात मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. तर, सूरज सिंग असे अंत्यविधीसाठी इंदुरहून निघालेल्या मुलाचे नाव आहे.
दोघांवरही रेवा जिल्ह्यातील जत्री येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राणी देवी बुधवारी मुलगा सनी याच्यासोबत माहेरी जात होत्या. दरम्यान, १२ किलोमीटर दूर असलेल्या डुभौरा इथं त्यांना दुचाकीनं जोरदार धडक दिली. या वेळी जखमी राणी देवी यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना रेवा इथं हलवण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, रेवा इथं उपचारासाठी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूची बातमी समजताच सूरज इंदुरहून आपल्या गावी मित्राच्या गाडीतून रवाना झाला. गावापासून सुमारे १०० किमी अंतरावर असताना सूरजच्या कारचा रामपूर इथं अपघात झाला. त्यामुळं आई आणि मुलाचा अवघ्या १२ तासांच्या आत अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.





