‘उद्धव ठाकरे कधीही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत ही काळया दगडावरची रेघ’ ”या” नेत्याच्या विधानामुळे राजकारण तापले

Uddhav Thackeray | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांकडून जागावाटप आणि मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होत आहे. अशात महाविकास आघाडीकडून गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याकडून संघर्ष बघायला मिळत असतांना आता शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
शहाजी बापू पाटील म्हणाले,’उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे ही गोष्ट सातत्याने ठाकरे सेनेच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर येत असते. त्यामुळेच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून उलट सुलट दावे होत असतात. याबाबत शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्टता केल्याने उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नाला तडा जात असल्याचे दिसत आहे. अशावेळी संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगत असताना शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ते कधीही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत ही काळया दगडावरची रेघ असल्याचा टोला लगावला आहे.
शाहजी बापू पाटील पुढे म्हणाले,’जागा वाटपात आम्हाला एकही जागा देऊ नका पण मला मुख्यमंत्री करा असेही उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणताना दिसतील. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रातली जनता संजय राऊत यांचे एकपात्री नाटक बघून वैतागली असल्याने आता तू काय बोलणार याकडे कोणीही लक्ष देत नाही असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे.
तत्पूर्वी, आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रच ठरवेल. जनतेला सर्वांचे काम माहिती असून, उद्धव ठाकरे यांचे देखील काम माहिती आहे, असे सूचक वक्तव्य करीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे संकेत दिले होते.




