मुंबई – शिवसेनेसाठी आताचा काही काळ कसोटीचा आहे. त्यामुळे यांना शिवसेना फक्त फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्र रचले जात आहे. आम्ही तर आता तुमच्याच माणसाला मुख्यमंत्री केले आहे. ज्यांनी शिवसेना फोडली किंवा जे संपवायला निघालेत, त्यांना शिवसेना बळकवायची आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ठाकरेंनी शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना बळकवून त्याचं अस्तित्व त्यांना नको. मात्र, आता तुम्हाला भगवा ठामपणे हातात पकडायची गरज आहे. शिवसेना ही एकच आहे. एकच होती आणि एकच राहील. ती म्हणजे आपली शिवसेना.., असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरी शिवसेना या राज्यात येऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही यांच्या भ्रमाला बळी पडू नका. कारण थोडे दिवस हे आमिष दाखवण्याचे काम करतील. मात्र, त्यांना पुरंदरचा मावळा विकला जाता कामा नये आणि शरण जाता कामा नये. त्यामुळे शिवसैनिकांनी आता जोमाने कामाला लागावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नक्की कोणाची शिंदे गटाची की उद्धव ठाकरेंची?, यावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हीच खरे कट्टर शिवसैनिक आहोत, असं म्हणत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना संपवण्याचं काम हे बंडखोर नेते करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.