राजकीय हालचालींना वेग ! अंतरवालीत मनोज जरांगे-उदय सामंतांची भेट ; भेटीवर सामंतांचे भाष्य,म्हणाले,”…

Uday samant met manoj jarange । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची अंतरवालीत जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. त्यांच्या या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी ही भेट झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. सर्व पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आपले निर्णय, उमेदवार जाहीर करू असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. या दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.
मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली चहा घेतला Uday samant met manoj jarange ।
मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. मी त्यांना विचारलं त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे. आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही” असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी,”लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे. मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या दरम्यान एक मित्र म्हणून देखील चर्चा होऊ शकते, भेट होऊ शकते. या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी विनंती आहे, असेही यावेळी उदय सामंत यांनी म्हटले.
आम्ही आमच्या निर्णयावर ठाम Uday samant met manoj jarange ।
उदय सामंत यांच्या भेटीवरती मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भेटीवेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. दरम्यान फडणवीस यांनी आरक्षण न दिल्यामुळे 30 तारखेला निर्णय येईल, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आम्ही जे स्वप्न बघितलं ते पुर्ण झालं नाही, आम्हाला आशा लागली बोती आरक्षणाची ती फडणवीसांनी पुर्ण होऊ दिली नाही. आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते आरक्षण फडणवीसांमुळं मिळू दिलं नाही, असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे.





