Sonam Wangchuk : “सरकार आणि युवा पिढीतील विश्वास महत्त्वाचा”; सोनम वांगचूक यांचे विधान
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गुरुवारी संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयकाचे स्वागत केले आहे.

Sonam Wangchuk – पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गुरुवारी संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा (सुधारणा) विधेयकाचे स्वागत केले आहे. या विधेयकामुळे देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत अधिक व्यापक सुधारणा होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याचसोबत, परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात नुकत्याच झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा एफआयआर दाखल न करण्याचे दिलेले लिखित आश्वासन सरकारने पाळावे, असे आवाहन वांगचूक यांनी केंद्र सरकारला केले आहे.
लडाखला जात असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात वांगचूक म्हणाले की, त्यांनी दिल्ली ते श्रीनगर असा प्रवास वंदे भारत ट्रेनने केला. चिनाब रेल्वे पुलावरून झालेला हा प्रवास अत्यंत सुंदर अनुभव होता आणि मला भारतीय रेल्वेचा अभिमान वाटतो, असे ते म्हणाले.
परीक्षा पद्धत पारदर्शक बनवण्यासाठी संसदेत आणलेल्या नव्या विधेयकावर बोलताना त्यांनी नमूद केले की, परीक्षेशी संबंधित सुधारणा विधेयक संसदेत आणले गेले याचा मला आनंद आहे. पण मला आशा आहे की ही सुधारणा केवळ परीक्षांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण शिक्षण पद्धतीत घडवून आणली जाईल.
आंदोलन मागे घेताना सरकारसोबत झालेल्या कराराचा उल्लेख करत वांगचूक म्हणाले, मी सरकारला विनंती करू इच्छितो की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, असे जे लिखित आश्वासन आधी मला आणि नंतर आंदोलक पक्षाला देण्यात आले होते, त्यावर सरकारने ठाम राहावे.
त्याचे काटेकोर पालन करून देशात, विशेषतः तरुण पिढीमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. एक महान भारत आणि सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी सरकार आणि युवा पिढी यांच्यात परस्परांवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे, यावर वांगचूक यांनी भर दिला.





