Supriya Sule : “तृणमूलचं मॉडेल शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा…”; सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं? विलिनीकरणावर म्हणाल्या…
Supriya Sule : आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडत, पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरला होता. या संभाव्य विलिनीकरणासंदर्भात दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावल्याची माहिती समोर आली होती. बैठकीपूर्वी नाना पटोले यांनीही या विषयावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते.
मात्र, या सर्व चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कोणताही विलिनीकरणाचा प्रस्ताव पक्षाकडे आलेला नसल्याचे स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडत, पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नसून शरद पवार किंवा पक्षातील कोणत्याही नेत्याशी याबाबत संपर्क साधण्यात आलेला नाही. शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याशी विलिनीकरणाबाबत कुणीही संपर्क साधलेला नाही. ही चर्चा नेमकी कुठून सुरू झाली, हेच मला माहीत नाही.” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
राजकीय पक्षांतील नेते विविध कामांसाठी एकमेकांना भेटत असतात. मात्र, त्याचा अर्थ पक्षांतर किंवा विलिनीकरण असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोणी आमच्याकडे येत आहे किंवा आम्ही कुणाकडे जात आहोत, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
भाजपवर साधला निशाणा
घरं फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केले नाहीत आणि करणारही नाही असं म्हणत त्यांनी भाजपावरही निशाणा साधला. तसंच तृणमूलचं मॉडेल शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा वेगळं नाही. आधी शिवसेना, राष्ट्रवादीवर हल्ला झाला आणि आता तृणमूलवर झाला असल्याचे मोठं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष असणार आहे.
तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य समीकरणांबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. “ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची बैठक झाली होती, मात्र त्यानंतर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. मीही त्यांच्याशी याबाबत चर्चा केलेली नाही,” असे त्या म्हणाल्या.
देशातील सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षेतील गोंधळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या गंभीर विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे. अशा वेळी राजकीय वादांपेक्षा देश वाचवण्याची आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची वेळ आली आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दर्शवला. “मी रोहितला उपोषण करू नको असे सांगितले होते. मात्र शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि प्रेम यामुळे त्यांनी हा लढा उभारला आहे. शेतकऱ्यांसाठी तो लढत आहेत, याचा मला अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.






