शिवापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच.. सोडवणूकीसाठी उपाययोजना करा! अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर टोल नाका हा गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, खड्ड्यांची रेलचेल आणि पावसामुळे साचणारे पाणी यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागात रस्त्याच्या कामासाठी प्रचंड टोल वसूल करण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा अत्यंत निराशाजनक आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, पावसाळ्यात तर हे खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत.
वाहतूक कोंडी तर दररोजचीच बाब झाली आहे. शिवापूर परिसरातील राजगड पोलीस स्टेशनदेखील या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. टोल नाक्यावर कुठलाही ट्रॅफिक मॅनेजमेंटचा प्रभावी उपाय नसल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
स्थानिक प्रशासन, महामार्ग प्राधिकरण (MSRDC), व पोलिस प्रशासनाने याबाबतीत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांचा संयम सुटू लागला असून, या समस्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा काही नागरिक संघटनांनी दिला आहे.





