Shreyas Sister Statement : “धोनी-रोहित आणि सचिनही सामने हरलेत…!”, श्रेयसच्या पाठीशी उभी राहिली बहीण श्रेष्ठा; टीकाकारांना सुनावलं
Shreyas Sister Statement : श्रेष्ठा अय्यरने थेट महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांचा दाखला देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Shreyas Iyer Sister Shrestha Iyer Statement on Dhoni Virat Rohit Sachin : भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. टी-२० वर्ल्ड कप विजयानंतर लागोपाठ पराभव स्वीकारणाऱ्या टीम इंडियाच्या कपाळावर इतिहासातील सर्वात मोठी ‘लूझिंग स्ट्रीक’ (पराभवाची मालिका) लागली आहे. यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरवर चहूबाजूंनी कडक टीका होत असतानाच, आता त्याच्या बचावासाठी त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर मैदानात उतरली आहे. तिने थेट महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज कर्णधारांचा दाखला देत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
“धोनी, रोहित आणि सचिननेही सामने हरलेत…!” श्रेष्ठाचा संतप्त सवाल –
आपल्या भावाच्या कप्तानीवर उठणाऱ्या प्रश्नांवर बोलताना श्रेष्ठा अय्यर म्हणाली, “फक्त थांबा आणि वाट पाहा, श्रेयस हा भारताच्या इतिहासकाळातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक सिद्ध होईल. बाहेर बसून ‘कर्णधार म्हणून तो सामने हरतोय’ असे म्हणणे खूप सोपे आहे, पण तुम्हाला आतील खरी परिस्थिती माहीत नसते. लोक केवळ निकालाच्या आधारे कर्णधाराचे मूल्यमापन करतात.”
🚨 Shrestha Iyer backs Shreyas Iyer to become one of India’s best captains:
“Just wait and watch. He will be one of India’s best captains. It’s easy for us to say, ‘As a captain, he’s losing, he’s losing.’ But you don’t know the full picture. People only judge a captain based on… pic.twitter.com/vE1hthKo6d
— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) July 8, 2026
तिने पुढे भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंचा उल्लेख करत म्हटले की, “भारताच्या प्रत्येक कर्णधाराने आपल्या पद्धतीने सर्वोत्तम काम केले आहे. शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर या सर्वांनीही आपल्या कप्तानीमध्ये अनेक सामने हरले आहेत. पण जर तुम्ही फक्त श्रेयसलाच टार्गेट करत असाल, तर कदाचित खरी समस्या संघात दुसरीकडेच कुठेतरी आहे. तो लवकरच पुनरागमन करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की तो देशाचा यशस्वी कर्णधार बनेल.”
आज ट्रेंट ब्रिजवर ‘करो या मरो’ची अग्निपरीक्षा –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना आज ९ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. विश्वविजेत्या भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ (Must-Win) असा असणार आहे; कारण आज पराभव झाल्यास मालिका भारताच्या हातातून जाईल. टी-२० वर्ल्ड कप २०२४ आणि २०२६ च्या दरम्यान भारताने एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही, त्यामुळे हा पराभव मोठा धक्का ठरेल. हा अत्यंत महत्त्वाचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरू होईल, जिथे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी अग्निपरीक्षा असेल





