Rahul Gandhi On PM :”मोदी एका वर्षात जाणार…” ; पंतप्रधानांच्या पायउताराचा राहुल गांधींकडून पुनरुच्चार
Rahul Gandhi On PM : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याच्या दाव्यांवरून वाद निर्माण केला आहे.

Rahul Gandhi On PM : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याच्या दाव्यांवरून वाद निर्माण केला आहे. भाजपनेही या विषयावर पत्रकार परिषद घेऊन , सरकार अंगदच्या पायांइतके स्थिर आहे आणि १०० राहुल गांधीसुद्धा त्याला डगमगवू शकत नाहीत.” असं म्हणत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले होते.
या वादाच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी मोदी पद सोडणार असल्याच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. इतकेच नाही तर, जर १९८० आणि १९९० च्या दशकात दलितांकडे लक्ष दिले असते, तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच नसते” असे मोठे विधान देखील त्यांनी केले आहे.
दिल्लीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची एक मोठी धोरणात्मक बैठक पार पडली. ही बैठक काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांनी बोलावली होती. (Rahul Gandhi On PM)
राहुल गांधी हे या बैठकीचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी बैठकीत, “जर काँग्रेसने १९८० आणि १९९० च्या दशकात अनुसूचित जाती समुदायावर अधिक लक्ष केंद्रित केले असते, तर प्रादेशिक पक्ष राजकीयदृष्ट्या मजबूत झाले नसते.”असे म्हटले.
पंतप्रधान मोदी एक्सपोज झाले
आर्थिक आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, “मोदी एका वर्षात निघून जातील. वाढती महागाई, बेरोजगारी आणि अमेरिकेसोबतचा व्यापार करार यांसारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडे पडले आहेत,” असे ते म्हणाले.
दलित सहभाग वाढवण्यावर राहुल गांधींचा भर (Rahul Gandhi On PM )
पक्षाची संघटना आणि सरकारमध्ये दलित सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे, तिथे सत्ता आणि संघटनात्मक अशा दोन्ही स्तरांवर अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली.
या महत्त्वाच्या बैठकीत दक्षिण भारतातील १५ राज्यांतील ३८० जिल्हाध्यक्ष आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. दलित समाजात काँग्रेस संघटना मजबूत करणे, तळागाळात पक्षाची उपस्थिती वाढवणे आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर रणनीती विकसित करणे यावर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले होते.






