Ganesh Naik :‘बाहेर काढलेली भुतं परत बंद करण्याची ताकद असेल…’; गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
Ganesh Naik : त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Ganesh Naik : राज्यात सध्या धर्म, जात आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून आंदोलने सुरू आहेत. त्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारसमोर आव्हाने वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी सत्तेतीलच घटकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
“राज्यात सध्या विविध आंदोलने सुरू आहेत. धर्मावरून, जातीवरून आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलने होत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि सर्वच मंत्री टेन्शनमध्ये आहेत. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना धर्म आणि जातीच्या नावाने सुरू असलेल्या आंदोलनांचा ताप राज्यकर्त्यांना होत आहे. काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत. बाटलीतली भुतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येत आहेत. त्यामुळे काढलेली भुतं परत बाटलीत बंद करण्याची ज्यांच्यात ताकद असेल, त्यांनीच ती बाहेर काढावीत.”अशी अप्रत्यक्षपणे टीका गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या १५ व्या दिवशी त्यांनी मुंबईकडे मोर्चा काढण्याची मोठी घोषणा केली. यावेळी जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका करत मुंबई मोर्चाची रूपरेषाही स्पष्ट केली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या दिशेने ‘भगवं वादळ’ कूच करणार असल्याने सरकारसमोर मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा करण्यात आला असला, तरी आश्वासनांपैकी काही मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. महिन्याभरापूर्वी गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर योजनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ३० वर्षे पूर्ण न झालेल्या, पडझडीला न आलेल्या आणि अतिधोकादायक नसलेल्या इमारतींचाही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आता पुन्हा एकदा नाईक यांनी ‘बाटलीतली भुते’ आणि ‘लावलेल्या आगी’चा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा निशाणा नेमका कोणाकडे आहे, यावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमधील जुना संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आल्याने ठाण्यासह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.





