कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान शहरात तपासणीसाठी आलेल्या आरोग्य सहाय्यकांना आपल्यापाण्याचे साठे दाखवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दूषित पाण्यात औषध टाकावे. वैद्यकीय पथकाने सांगितलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. तसेच डासांपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोपरगाव – कोपरगाव शहरातील डासांचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभागाचे 45 कर्मचारी असलेले पथक दाखल झाले आहे. हे पथक शहरातल्या विविध भागात जाऊन डासांवर सर्जिकल स्ट्राईक करणार आहे.
शहरात मागील दोन महिन्यांपासून साथीच्या व किटकजन्य आजारांनी थैमान घातले. या आजारांनी आतापर्यंत चौघांचा बळी घेतला गेला आहे.
डासांची उत्पत्ती बंद करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व नगरपालिका सतर्क झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून डासांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभागनिहाय औषध फवारणी, धूर फवारणीसह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर येथून आरोग्य विभागाच्या जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी एस. आर. सावंत यांनी स्वतः शहरात येऊन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर यांच्या सूचनेप्रमाणे शहर डास मुक्त करण्यासाठी पथके तयार केली आहेत.
आज ग्रामीण रुग्णालय व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील 42 हजारांपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य सेवक, आशा सेविका, आरोग्य सहायक, तालुका पर्यवेक्षकांचा समावेश असलेल्या पथकाने शहरातील विविध भागांत डास निर्मूलनाची मोहीम राबवून डासांच्या आळ्या, अंडी असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली.
जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, नगर व कोपरगाव येथील जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सहायकांचा पथकात समावेश होता. शहरात डेंग्यूसदृश डासांची उत्पत्ती प्रमाणापेक्षा जास्त झाली आहे. शहरात 4 ते 8 दिवसांनी नगरपालिका पाणीपुरवठा करत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागते. त्यामुळे या डासांची उत्पत्ती होत आहे.
डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी निकामी गाड्यांचे टायर, नारळाच्या करवंट्या, आडगळीत ठेवलेले साहित्य येथे डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी केले आहे.