कर्जत – राज्यात एक शेतकरी, एक ट्रान्स्फॉर्मर ही योजना लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत वीज मिळेल, असे प्रतिपादन नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. देऊळवाडी (ता.कर्जत) येथील नियोजित 400/220 के. व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा राज्याचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री ना. राम शिंदे होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, पंचायत समितीच्या सभापती साधना कदम, सभापती श्रीधर पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य कोपनर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनराज कोपनर, अशोक खेडकर,सरपंच वैशाली मोरे, उपसरपंच रमेश पवार, शिवसेना नेते बळीराम यादव, बिभीषण गायकवाड, महापारेषणचे संचालक रविंद्र चव्हाण, संजय ताकसांडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जयंत वीके, अधीक्षक अभियंता प्रवीण भालेराव, नाशिक येथील अधीक्षक अभियंता शरद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी, महापारेषण, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच देऊळवाडी-सिद्धटेक परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ना. बावनकुळे म्हणाले, सर्व शेतकऱ्यांना वीजपंप मिळेल. कर्जत तालुक्यात 212 कोटींची कामे केली आहेत. आगामी तीन वर्षात 804 कोटींची कामे करणार आहे. खा. डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षात मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. यातून मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळाली आहे. यावेळी बबनराव पाचपुते यांचेही मनोगत व्यक्त केले.
कर्जतला पुढे घेऊन जाणारा प्रकल्प
हा वीज उपकेंद्र प्रकल्प कर्जतच्या विकासाला पुढे घेऊन जाणारा आहे. अहमदनगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला त्याचा लाभ होणार आहे. कर्जत-जामखेड परिसरात आगामी काळात एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग येतील, तेव्हा विजेची कमतरता पडू नये यासाठी या उपकेंद्राचा लाभ होईल असे पालकमंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले.