TOP 10 News : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ते वैभव सूर्यवंशीला मिळाली खास परवानगी; जाणून घ्या आजच्या Top 10 News
Top 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

TOP 10 News : 1. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ
महागाईची झळ दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यातच आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. या ताज्या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाली आहे.
आज सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. स्थानिक कर आणि वाहतूक खर्चातील फरकामुळे सिलेंडरचे दर प्रत्येक शहरानुसार वेगळे असतील. याआधी ७ मार्च २०२६ रोजी सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढले होते. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात ताण येत असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे.
2. “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या,” रोहित पवार करणार अन्नत्याग आंदोलन
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते १२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आंदोलनाची माहिती देताना, २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली.
तसेच एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस) योजनेतील अटी शिथिल करून दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे ६.५६ लाख शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्यावा, पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करून एक रुपयातील पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
3. मान्सून महाराष्ट्रात दाखल; ‘यलो अलर्ट’ जारी
अखेर मान्सूनचे महाराष्ट्रात अधिकृतरीत्या आगमन झाले आहे. तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनासोबतच भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामान अंदाज जाहीर केला. २५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली या एकूण २५ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
4. पुण्यातील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणींची चौकशी
पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका खासगी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ आणि विनापरवाना दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या पार्टीत ६० ते ७० तरुण-तरुणी सहभागी झाले होते, ज्यांची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, सोशल मीडिया किंवा गुप्त कोडवर्ड्सच्या माध्यमातून तरुण-तरुणींना या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आल्याचा संशय आहे. या पार्टीला “प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी” असं नाव देण्यात आलं होतं. मध्यरात्रीपर्यंत अत्यंत मोठ्या आवाजात साउंड सिस्टम लावून, विनापरवाना दारूसह रिसॉर्टमध्ये धांगडधिंगा सुरू होता. छाप्याच्या वेळी अनेक तरुण आणि तरुणी नशेत पूर्णपणे झिंगलेल्या अवस्थेत आढळले. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमक्या कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
5. तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर! भेसळयुक्त पनीरसह ४७ लाखांचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाने पनीर, खवा, तूप आणि चीजसदृश पदार्थांमध्ये भेसळीचा संशय असलेल्या साठ्यावर कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि सातारा जिल्ह्यात छापे टाकले. त्यानुसार पुण्यात सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील १७ पनीर व खवाविक्रेत्यांवर प्रशासनाने एकाच वेळी धाडसत्र राबवले.
या कारवाईदरम्यान ३५ नमुने विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. तसेच, खरेदीची बिले नसलेला आणि अस्वच्छ वातावरणात साठवलेला सुमारे ४७ लाख ३६ हजार १८ रुपयांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या साठ्यात २,८०६ किलो पनीर, १३,१२७ किलो खवा, १३८ किलो चीज ॲनालॉग आणि ९६० किलो तुपाचा समावेश आहे. नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे.
6. कॉकरोच जनता पार्टीने 7 दिवसांची डेडलाइन; अन्यथा…
कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आंदोलन केले. याकरिता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यासाठी काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला. परंतु, सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने आपल्या डेडलाइनमध्ये बदल केला आणि सात दिवसांपर्यंत मुदत वाढवली. त्यानंतर देशभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे की, एकतर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांची हकालपट्टी करावी.
7. ५ इमारत, १३ प्लॉट्स आणि २ कोटी कॅश; इंजिनिअरकडं कोट्यवधींचे घबाड
‘इंटीग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी’च्या (ITDA) असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या ९ ठिकाणांवर दक्षता विभागाकडून छापेमारी करण्यात आली. संबंधित इंजिनिअर बैकुंठ नाथ बेहरा यांच्याविरुद्ध उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचे आरोप होते. त्यानुसार या कारवाईत बेहरा यांच्याकडे आतापर्यंत कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. यात एका पाच मजली इमारतीसह १३ महागड्या प्लॉट्सचा समावेश आहे.
याशिवाय, त्यांच्या दोन लॉकरमधून २ कोटी रुपयांची रोकड आणि ३०० ग्रॅमपेक्षाही अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. लॉकरमधील नोटांच्या गड्ड्या पाहून खुद्द अधिकारीही चक्रावले; ही रोकड मोजण्यासाठी बँकेतून कॅश काउंटिंग मशीन मागवावे लागले. हे दोन्ही लॉकर्स इंजिनिअर बेहरा यांच्या पत्नीच्या नावावर रजिस्टर्ड होते. ओडिशामधील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा येथे ही कारवाई करण्यात आली.
8. ट्रम्प प्रशासनाला धक्का! चेन्नईच्या श्रीराम कृष्णन यांनी सोडलं महत्त्वाचं पद
व्हाईट हाऊसचे मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी ॲडव्हायझर श्रीराम कृष्णन यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. येत्या जून महिन्याच्या अखेरीस ते आपले पद सोडणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय संदर्भातील धोरणे आखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे कृष्णन अचानक पद सोडत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राम कृष्णन हे मूळचे चेन्नईमधील आहेत.
राम कृष्णन यांनी एक्सवर एक भावूक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी या महिन्याच्या शेवटी व्हाईट हाऊसमधील माझी भूमिका सोडत आहे. हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान आणि सौभाग्य ठरला आहे. अमेरिकन जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.” तर काही काळाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एआय क्षेत्रातील आव्हानांवर काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आपल्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.
9. सचिन तेंडुलकरनंतर वैभव सूर्यवंशीला मिळाली खास परवानगी
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. लहान वयातच मिळालेल्या या प्रचंड आंतरराष्ट्रीय यश आणि प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि आयर्लंडच्या आगामी दौऱ्यावर टीम इंडियासोबत दोन विशेष व्यक्ती प्रवास करणार आहेत. वैभव सूर्यवंशी लहान असून, अवघ्या १५ वर्षांच्या वयात अचानक मिळालेली प्रसिद्धी, माध्यमांचे लक्ष आणि वरिष्ठ संघाचा प्रचंड दबाव हाताळणे हे कोणत्याही मुलासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते.
परिणामी, बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की वैभव सूर्यवंशीचे आई-वडील देखील इंग्लंड आणि आयर्लंडच्या आगामी दौऱ्यावर टीम इंडियासोबत प्रवास करतील. त्याच्या आई-वडिलांच्या उपस्थितीमुळे वैभवला घरच्यासारखे वातावरण मिळेल आणि त्याला परदेश दौऱ्यातील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल. यापूर्वी १९८९ मध्ये सचिन तेंडुलकर १६ वर्षांचा असताना भारतासाठी पदार्पण करण्यासाठी पाकिस्तानला गेला होता, तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित त्याच्यासोबत गेला होता.
10. ‘देऊळ बंद 2’च्या टीमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
‘देऊळ बंद 2’ सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर सिनेमातील मुख्य कलाकार आणि तंत्रज्ञानाच्या टीमनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सिनेमातील टीमला कौतुकाची थाप दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
‘समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची, तसेच त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाच्या टीमला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लेखक दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, निर्माते कैलाश वाणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा:


