Top 10 News : OBC आरक्षणात कपात होणार?, शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :ओबीसीचे राजकीय आरक्षण कपात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

OBC आरक्षणात कपात होणार?
निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश
Top 10 News : ओबीसीचे राजकीय आरक्षण कपात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेले तर कपात होणार असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानेकडून सरकार देण्यात आले होते. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्ग (OBC) यांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ओबीसी आरक्षणात कपात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! Top 10 News :
राज्यात १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. यंदा राज्यात उतरत्या क्रमाने पाऊस असणार असल्याच सांगितलं जातंय. पाऊस सामान्यच राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. नाही तर दुबार पेरणीचे मोठे संकट येऊ शकते, असा इशारा कृषी विभागान दिलाय. राज्यातील हवामानात सध्या मोठा बदल होण्यास सुरुवात झालीय . या आठवड्यात हवामानात अजून बदल होणार आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल. मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही. कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. त्यामुळे संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून करण्यात आलाय.
सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची
उमेदवारी कोणाला दिली?
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आपला उमेदवारी निश्चित केला आहे. रविवारी रात्री पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तब्बल पाच तास सुरु असलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे राष्ट्रवादीची विधान परिषदेची जागा विक्रम काकडे यांना देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यालयात काल रात्री 8.30 वाजता ही बैठक सुरु झाली होती. या बैठकीला संजय काकडे हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. आता श्रीकांत पाटील त्यांची उमेदवारी माग घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली
समाधान खिंडकरचा बनाव समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याची तक्रार खोटी निघालीय. समाधान खिंडकर याने ही तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी समाधान खिंडकरच्या विरोधात देशमुखांनी दिलेली तक्रारही खोटी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तर या संपूर्ण घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. समाधान खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादासाहेब खिंडकर यांचा भाऊ असून त्याने दादासाहेब खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोनच दिवसांपूर्वी समाधान खिंडकरवर या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मे महिना संपला;
लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार?
राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा खिळल्या आहेत. मे महिना संपल्यानंतरही अद्याप सरकारकडून १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. ३० एप्रिल रोजी ईकेवायसीची मुदत संपली आहे, त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना जून १० ते १५ या दरम्यान मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. कारण, प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल, असा जीआर सरकारकडून काढण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याच्या हप्त्यावर निर्णय घेण्यात येईल.
राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस;
मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा
राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून, पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुळे, नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा तसेच विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात रविवारी (ता. ३१) ३७ अंश सेल्सिअस कमाल, तर २५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ
आजपासून नवे दर लागू होणार Top 10 News :
देशभारत महागाईचा भडका उडाला असतानाच पेट्रोल-डिझेल सीएनजीनंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने सर्वसामान्यांची चिंता वाढवणारा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ केली आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत हि वाढ करण्यात आली असून परिणामी आता 42 ते 53 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग होणार आहे.दरम्यान, आजपासूनच म्हणजे 1 जुनपासून हि नवीन गॅस दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा चटका सर्वसामान्यांना आता सहन करावा लागणार आहे.
नेपाळने बळकावली भारताची जमीन;
पंतप्रधानांनी भर संसदेत केलं मान्य
आपल्या निर्णयामुळे माध्यामांमध्ये चर्चेत आलेले नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बलेंद्र शाह पु्न्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी ते कोणत्या निर्णयामुळे नाही तर आपल्या एका विधानामुळे. पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादासंदर्भात संसदेत एक धक्कादायक वक्तव्य केलंय. प्रतिनिधी सभेतील (संसदेतील) खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळने भारतीय जमिनीवर आक्रमण केल्याचं मान्य केलंय. सीमेवर अतिक्रमण केवळ एकाच बाजूने नाही, तर दोन्ही बाजूंनी झालंय. भारतासोबत नेपाळनेही भारतीय हद्दीवर अतिक्रमण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. संसदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान पंतप्रधान शाह यांनी हे विधान केलं आहे.
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद;
विजयासह रचला इतिहास
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने क्रिकेट विश्वात पराक्रम केला आहे. पराक्रमाची चाहते अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने शुबमन गिलच्या गुजरात टायटन्स (जीटी) संघाला पराभूत करत सलग दुसरे आयपीएल विजेतेपद पटकावले. आहे.अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, बेंगळुरुने प्रत्येक विभागात प्रभावी कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केलं आणि ५ गडी राखून सामना जिंकला. या विजयासह, आरसीबी आयपीएल विजेतेपद राखणारा तिसरा संघ ठरला. आयपीएल २०२६मध्ये आरसीबीनं धमाकेदार कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सनं दिलेलं १५६ धावांचे आव्हान आरसीबीने आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत पार केलं.आणि विजयावर नाव कोरले.
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन;
संगीत क्षेत्रावर शोककळा
संगीत जगतातून अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. मराठी संगीत क्षेत्रात सुमनताईंचे बहुमूल्य योगदान आहे. जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण, आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.





