Top 10 News : सरकारी गाड्यांवर VIP नंबरला नो एंट्री ; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आणि ‘देशासाठी मी अंधभक्तच आहे’, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे.

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडवर
मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय
Top 10 News : मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कक्षासाठी विधी सचिवाऐवजी अपर सचिव पदाची निर्मिती करण्यात येणार आहे. मराठा-कुणबी नोंदी आणि जात पडताळणी प्रमाणपत्रे रद्द होऊ नयेत, यासंदर्भातील कामकाज या कक्षामार्फत पाहिले जाणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारने चूक दुरुस्त न केल्यास मुंबईत ‘भगवं वादळ’ येईल, असा इशारा दिला आहे.
सरकारी गाड्यांवर VIP नंबरला नो एंट्री;
फडणवीस सरकारचा कडक आदेश
शासकीय अधिकारी आणि मंडळ-महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये VIP नंबरची वाढती क्रेझ लक्षात घेऊन राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर अर्थ विभागाने एक परिपत्रक काढले. त्यानुसार शासकीय वाहनांसाठी विशेष किंवा VIP नंबर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा नंबरसाठी होणारा अतिरिक्त खर्च सरकार मंजूर करणार नाही. वाहन खरेदी राज्य वाहन आढावा समितीच्या मान्यतेनुसारच होईल. हा निर्णय सर्व शासकीय विभाग, स्थानिक संस्था, विद्यापीठे, मंडळे आणि महामंडळांना लागू असून वित्तीय शिस्त राखण्याचा उद्देश आहे.
घाटकोपरमध्ये दरड कोसळली;
अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मुंबईतील घाटकोपरच्या अशोक नगरमधील गौसिया चाळ परिसरात पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळून दोन ते तीन घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली. तर पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. यादव विकी, वाजिद अली, आरिफ शेख, मन्नत, आबन शेख आणि सद्दाम शेख हे अडकलेल्यांमध्ये असल्याची माहिती आहे.
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय;
घाट परिसराला ऑरेंज अलर्ट
मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि सक्रिय मान्सून ट्रफच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून, मुंबईतही पावसाची रिपरिप कायम राहणार आहे. पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भात १७ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि घाटांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे.
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा;
१० आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस’च्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी १० आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर राज्यातील ४३४ परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण, औषध चाचणी नोंदी, एसओपी आणि लेबलिंगची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आणखी १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीएने दिला आहे.
विमानात AC बंद, प्रवाशांची घुसमट
स्पाइसजेटविरोधात प्रवाशांचा संताप Top 10 News :
दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेट विमानात उड्डाणापूर्वी एसी बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड उष्णता व घुसमट सहन करावी लागली. अनेकांना घाम व श्वास घेण्यास त्रास झाला. रनवेवर नेल्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही. संतप्त प्रवाशांनी उड्डाणाला विरोध करत विमानातून उतरवण्याची मागणी केली. कर्मचाऱ्यांकडून अरेरावी व धमकीचा आरोप झाला. तांत्रिक बिघाड समोर आल्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आणि संबंधित घटनेची सखोल चौकशी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याची मागणीही जोर धरत आहे. विमान कंपनीवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रवाशांकडून मागणी
PM मोदींनी शेअर केला खास व्हिडीओ
देशवासीयांना केले विशेष आवाहन
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत देशवासीयांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. “१५ ऑगस्ट अभिमानाने साजरा करा, स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहा आणि विकसित भारताचा संकल्प करा. प्रत्येक घरी तिरंगा फडकवा,” असं मोदींनी म्हटलं आहे. देशभरात १५ ऑगस्टच्या तयारीला वेग आला असून विविध ठिकाणी तिरंगा रॅली काढल्या जात आहेत. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात २०२२ मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत करण्यात आली होती. दरम्यान, इन्स्टाग्रामवर मोदींचे १०६ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना ‘ही’ शिक्षा;
मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा ठपका; जगभरात खळबळ
सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल-असद यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्धगुन्ह्यांप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनाही त्यांच्या अनुपस्थितीत ही शिक्षा सुनावण्यात आली. २०११ पासून सुरू असलेल्या सीरियातील यादवी युद्धादरम्यान हत्या, छळ आणि बेकायदेशीर अटकेचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर बशर आणि माहेर यांनी रशियात आश्रय घेतला. न्यायालयाने त्यांना आंतरराष्ट्रीय कायदेशीर मार्गाने न्यायालयासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
हॉकी वर्ल्ड कप २०२६ची उत्सुकता;
भारताचे सामने कधी आणि कुठे पाहणार?
फिफा वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता क्रीडाप्रेमींचे लक्ष हॉकी वर्ल्ड कप २०२६कडे लागले आहे. नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून महिला अंतिम सामना २९ ऑगस्ट, तर पुरुषांचा अंतिम सामना ३० ऑगस्टला होईल. स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार असून यंदा उपांत्यपूर्व फेरीऐवजी दुसऱ्या ग्रुप स्टेजचा नवा फॉरमॅट असेल. भारतीय पुरुष संघ ‘पूल डी’मध्ये इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्ससोबत आहे. महिला संघ याच गटात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. पुरुष संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंह, तर महिला संघाचे नेतृत्व सलीमा टेटे करणार आहे. भारताचे सामने स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहेत.
ट्रोलिंगनंतरही ईशा कोप्पीकर ठाम;
म्हणाली,‘देशासाठी मी अंधभक्तच आहे’ Top 10 News :
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ईशा कोप्पीकरने घेतलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. तिच्या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करत अनफॉलो केल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ‘फिल्मीबीट’ला दिलेल्या मुलाखतीत ईशाने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. “अनेकांनी मला अंधभक्त म्हटलं, पण आपल्या देशासाठी मी अंधभक्तच आहे,” असं ती म्हणाली. फॉलोअर्स गमावण्याच्या भीतीने आपली मतं बदलणार नसल्याचंही तिने सांगितलं. वेगळी भूमिका घेणाऱ्यांचा आदर करते, मात्र अपशब्द आणि राष्ट्रविरोधी वर्तनाचं समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका तिने मांडली.





