तुरुंगात वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली Top 10 News : मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती ढासळल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याला सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडलीय . गेले तीन दिवस वाल्मिक कराड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला सलाईन लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला मूत्राशयाचा आजार झाल्याची माहिती आहे.बीड जिल्हा रुग्णालयातील पथकाने वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याला सलाईन लावण्यात आली असून त्याची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाल्मिक कराड याला वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. तुकाराम मुंढेंची 25 वी बदली आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले आणि सातत्याने बदलीचा त्रास सहन करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. OBC क्रिमीलेअर मर्यादा वाढवण्याची शिफारस राज्यातील ओबीसी समूदायासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ओबीसी नॉन क्रिमीलेअर मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे. याचसोबत ओबीसी समूदायात 43 नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णयही ओबीसी उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसी जात पडताळणीच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घ्यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींवरही चर्चा करण्यात आली. चुकीच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप देऊ नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या. डोकाडिया कुटुंबातील व्यक्तींच्या यकृत अन् मूत्रपिंडाचा हिरवट रंग मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातीलचारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. असता याच प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने देखील एफएसएल चाचणीसाठी पाठवण्यात आले. झिंक फॉस्फाइड मिश्रित मीठ कलिंगडावर लावण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबियांच्या शरीरात झिंक फॉस्फाइड आढळल्याच्या फॉरेन्सिक अहवालाला हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून दुजोरा दिला आहे. मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आल्याचं हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात स्पष्ट झालं आहे. मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून येण हा झिंक फॉस्फाइड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत असल्याच अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे आता पोलिसांनी घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने देखील एफएसएल चाचणीसाठी पाठवले आहेत. औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप Top 10 News : देशभरात आज अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आलेला असून या अनुषंगाने राज्यातील एक लाख 25 हजार तर देशातील साडेबारा लाख औषध विक्रेते हे सहभागी होणार आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य व अत्यावश्यक रुग्णांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात होत असलेल्या ऑनलाइन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा औषध विक्रेते संघटनेने केला आहे.बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप करत साडेबारा लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने देशभरात बंदची घोषणा केली आहे. देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देश लवकरच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार असून त्याचा सर्वाधिक फटका युवक, शेतकरी, कामगार आणि लघुउद्योजकांना बसेल, असा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधी यांनी, देशातील सध्याची आर्थिक व्यवस्था काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही व्यवस्था जास्त काळ टिकणार नाही आणि लवकरच देशाला मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. जो आर्थिक झटका बसणार आहे त्याचा परिणाम उद्योगपतींवर होणार नाही, तर सामान्य नागरिकांवर होणार आहे.असं म्हटलंय. राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांचा उल्लेख करत केंद्र सरकारची आर्थिक धोरणे काही निवडक उद्योगसमूहांना लाभदायक असल्याचा आरोप केला. १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील विदर्भासह राजस्थान, दिल्ली अन् उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली होती. पण नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने १३ राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळाचा इशारा आयएमडीकडून दिला आहे. पुढील १५ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या काळात ६६ ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंडसह १३ राज्यात पुढील १५ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानात बदल होत असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आलाय . घराबाहेर पडताना नागरिकांनी एकदा हवामान तपासून घेण्याचा सल्लाही दिलाय. ‘Welcome to Rome, my friend!’ सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी हे मंगळवारी रात्री इटलीत दाखल झाले. यानंतर त्यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटरेला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी भारतआणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रोम येथील फ्लावियन ॲम्फिथिएटर असलेल्या प्राचीन कॉलेजियमच्या वास्तूत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत एक सेल्फी काढला. हा सेल्फी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला असून त्याला, ‘Welcome to Rome, my friend!’, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कसोटी, वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा भारतात सध्या आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. लीग स्टेजचे काही सामनेच शिल्लक आहेत. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जूनमध्ये कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना आणि ३ वनडे सामने होणार आहेत. आयपीएलची धूम सुरू असतानाच, १९ मे रोजी गुवाहाटीत निवड समितीची बैठक झाली. त्यात कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. एक कसोटी सामना होणार असून, तो ६ जून रोजी मुल्लांपूरला सुरू होईल. त्यासाठी १४ सदस्य असलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. सुप्रसिद्ध गायिकेचा दुर्दैवी अंत Top 10 News : मंनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौर उर्फ यशइंदर कौर हिची हत्या करण्यात आली आहे. सहा दिवस बेपत्ता असलेल्या इंदर कौरचा मृतदेह 19 मे रोजी सकाळी लुधियानाजवळी नीलो कालव्यात आढळून आला. 29 वर्षांची इंदर सहा दिवसांपासून बेपत्ता होती. तिला गन पॉईंटवर किडनॅप करण्यात आल्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, कॅनडाहून आलेल्या एका व्यक्तीनं इंदर कौरला लग्नाची मागणी घातलेली, पण तिनं त्याला नकार दिल्यामुळे त्यानंच तिचा जीव घेतल्याचा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.