Top 10 news: पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नकोय, थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये,अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर
Top 10 news: सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर टीका करण्यात आलीय. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता.

Top 10 news: पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नकोय
सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर टीका करण्यात आलीय. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे, अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. अशा शब्दांत सामना अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.
गौतम अदानी यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर देशभरातून त्यांना अजूनही आदरांजली वाहण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर उद्योगपती गौतम अडानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे सांत्वन केले. अदानी हे जवळपास 45 मिनिटे शरद पवारांच्या निवासस्थानी होते, त्यामुळे अजित पवारांच्या अपघातासंदर्भाने व कौटुंबीक चर्चाही त्यांनी केल्याची माहिती समोर येतीय. गौतम अदानी आणि पवार कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध आहेत. अजित पवार यांचेही अदानींसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे अजित पवारांचे निधन हे अडानी यांना देखील धक्काच असल्याचं म्हटलं जातंय.
यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक ही तीन खाती देण्यात आली. मात्र अजित पवारांकडे असलेले महत्वाचे अर्थखाते त्यांना देण्यात आलं नाही. राष्ट्रवादी सत्तेत आहे पण या पक्षाकडे वित्त खाते नाही अशी वेळ पहिल्यांदाच आलीय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्तखाते न दिल्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे. अजितदादांनी अर्थसंकल्पाची बरीच तयारी केली होती. यापुढे मी स्वत: लक्ष घालून पुढची प्रोसेस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा वित्त खाते आमच्याकडेच ठेवा. ते होणार नसेल तर महत्त्वाची अन्य दोन खाती आमच्या पक्षाला द्या असं साकडं घातल्याची माहिती समोर येतीय.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ Top 10 news:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड झालीय. ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतलंय. कणकवलीतील हरकुळ खुर्द याठिकाणी झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय. सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गावांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. इतकेच नाही तर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात २०१९ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये परतले आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मोठा निर्णय समोर आलाय. 7 दिवसांत 22 प्रचारसभा देवेंद्र फडणवीस घेणार होते, परंतु अजितदादांच्या निधनामुळे त्यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे फडणवीस कोणतीही सभा घेणार नाहीत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराचा नकाशा बदलणार असून पक्षाने या परिस्थितीत शांततेत निवडणूक प्रचारासाठी धोरण ठरवलंय. दरम्यान , अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीने देखील हाच निर्णय घेत जिल्हापरिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता.
‘काटे फिरले, थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय.”आता काटा उलटा फिरायला लागलाय,लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत,थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान खोत यांनी जयंत पाटील यांच्या बाबतीत केलंय. भाजपानं त्यांना घ्यायचं का नाही ते बघावं लागेल, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही, कधी उडी मारायचं, ते बघायला लागलय,असा टोलादेखील सदाभाऊ खोत यांनी लगावला. दरम्यान , त्यांच्या दाव्यावर आता जयंत पाटलांची नेमकी प्रतिक्रिया काय येते हे पाहणं गरजेचं आहे.
महाराष्ट्रात यलो अलर्ट
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर जाणवत आहेत. हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण, पावसाची नोंद आणि वाऱ्याचा वेग वाढल्याचं चित्र आहे. हवामान विभागानं आज राज्यातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.कोकण किनारपट्टीवर आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये सकाळच्या वेळेत थंडी जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढलेला दिसेल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी भूकंपापाचे जोरदार धक्के जाणवले. ४.६ रिश्टर स्केलचा एवढी भूकंपाची तीव्रता असल्याचं सांगण्यात येतंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास भूकंप झाला, ज्यामुळे अनेक भागातील रहिवासी घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचं केंद्र बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण परिसरात असल्याचं सांगितले गेले आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की ते आजूबाजूच्या परिसरातही जाणवले. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
पान मसाल्यावर सरकार ८८% कर आकारणार
२०२६-२७ या आर्थिक वर्षात पान मसाल्याच्या उत्पादनावर लादलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला १४,००० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ४०% जीएसटीपासून वेगळे असलेले आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर १ फेब्रुवारी २०२६ पासून पान मसाल्यावर लादण्यात आलेत. हा उपकर पान मसाल्याच्या उत्पादक कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे मोजला जाईल. ४०% जीएसटी जोडल्यानंतर, पान मसाल्यावरील एकूण कराचा भार ८८% राहील. अर्थसंकल्पानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन महिन्यांत आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून २,३३० कोटी रुपये आणि २०२६-२७ मध्ये १४,००० कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष पेटला
पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये सध्या संघर्ष पेटलाय. बलुचिस्तान 10 जिल्ह्यांवर हल्ले केल्यानंतर आक्रामक झालेल्या पाकिस्तान प्रतिहल्ला चढवला. त्यामुळ तब्बल 40 तास या दोघांमध्ये गृह युद्ध सूरू होते. या युद्धात आतापर्यंत 200 पाकिस्तानी नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. यामध्ये 31 नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 145 बीएलए सैनिकांचा समावेश होता. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडालीय. बलुचिस्तानच्या या हल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्यावर 40 तास हल्ला करून त्यांना प्रत्युत्तर दिले होते. यामध्ये 31 नागरिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 145 बीएलए सैनिकांचा समावेश होता.





