Top 10 News: शेतकरी असेल तर जमीन खरेदी, ठाण्यात विनायक राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा आणि रिंकू राजगुरूचा पहिला म्युझिक अल्बम, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News:

शेतकरी असेल तर जमीन खरेदी ;
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Top 10 News: राज्यात शेतीची जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असल्याचा वैध पुरावा अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. धुळ्यातील संशयास्पद जमीन व्यवहारांची विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी होणार असून बनावट सातबारा, खोटी कागदपत्रे आणि फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना जमाबंदी डेटाबेसचा थेट प्रवेश देण्यात आला असून, जमीन नोंदणीवेळी अर्जदाराची शेतकरी स्थिती व मालकीची पडताळणी तात्काळ केली जाईल.
मोशी दुर्घटना: 81 तासांनंतर बचावकार्य संपले;
9 जणांचा मृत्यू, 14 कामगारांची सुटका
मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पातील इमारत दुर्घटनेनंतर सुरू असलेले बचावकार्य तब्बल 81 तासांनंतर पूर्ण झाले. या भीषण दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाला, तर 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही घटना घडली होती. दरम्यान, इमारतीच्या बांधकाम परवानग्या, कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात विनायक राऊत कुटुंबाविरोधात गुन्हा;
सुनेचे मानसिक-शारीरिक छळाचे गंभीर आरोप
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सून गिरीजा राऊत यांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वयेही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत मानसिक व शारीरिक छळ, जबरदस्तीने गोमूत्र पाजल्याचा आरोप, मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधे घेण्यास भाग पाडल्याचा तसेच वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पावसाने घेतली विश्रांती;
पश्चिम प्रशांतातील वादळामुळे मान्सून कमकुवत
राज्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर मान्सूनने विश्रांती घेतली असून उष्णता आणि उकाडा पुन्हा वाढला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम प्रशांत महासागरातील शक्तिशाली वादळामुळे हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने मान्सूनचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर 500-600 मिमी पावसानंतर गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी पावसाची नोंद जवळपास शून्यावर आली. पुढील पाच ते सहा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!
SET परीक्षा पुढे ढकलली Top 10 News:
राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) पुढे ढकलण्यात आली असून 26 जुलैऐवजी आता 6 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. एमपीएससीच्या परीक्षा आणि आषाढी वारीमुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र व गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करणारी ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित केली जाते. निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून एमपीएससी आणि SET या दोन्ही परीक्षांची तयारी करणे अधिक सोपे होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा आरोप;
आमदारांना 30 कोटी, मंत्रिपदाची ऑफरचा दावा
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीनंतर आणखी एका राज्यातील राजकीय पक्षात भाजप सुरूंग लावण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना पक्षांतरासाठी 20 ते 30 कोटी रुपये, मंत्रिपद आणि राज्याचा दर्जा मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. श्रीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला. तसेच, एका भाजप पदाधिकाऱ्याने पक्षाच्या आमदाराशी संपर्क साधल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र, या आरोपांवर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हवाई हल्ले;
होर्मुझ सामुद्रधुनी बंद
अमेरिकेने इराणवर पुन्हा हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला असून, होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडनुसार, सायप्रसचा ध्वज असलेल्या कंटेनर जहाजावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, इराणने अमेरिकेचा हस्तक्षेप सुरू असेपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेलपुरवठा आणि समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चीनमध्ये पुरानंतर विषारी सापांचा कहर;
कोब्रासह हजारो साप रहिवासी भागात
चीनच्या गुआंगशी प्रांतातील भीषण पुरामुळे मोठे सर्प प्रजनन केंद्र वाहून गेल्याने कोब्रासह हजारो विषारी साप मोकळे झाले आहेत. पुराच्या पाण्यातून हे साप रहिवासी भागाकडे पोहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सापांना पकडण्यासाठी 10 तज्ज्ञांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून जाळी आणि अन्य उपकरणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुरामुळे गुआंगशी प्रांतात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
इंग्लंडकडून भारताचा 4-0 ने धुव्वा;
पराभवानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर
इंग्लंडने अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा 56 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 4-0 ने जिंकली. पाच सामन्यांच्या मालिकेत १ सामना पावसाने रद्द झाला तर बाकीचे ४ इंग्लडने जिंकले. दरम्यान,कालच्या सामन्यात जोस बटलरच्या 131 आणि हॅरी ब्रूकच्या नाबाद 95 धावांच्या जोरावर इंग्लंडने 257 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात ईशान किशन 56 आणि तिलक वर्माच्या 53 धावांची झुंजार खेळी असूनही भारत 201 धावांपर्यंतच पोहोचला. या दारुण पराभवानंतर 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानातच भावूक झाला. त्याचा अश्रूंनी भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिंकू राजगुरूचा पहिला म्युझिक अल्बम;
‘बाप विठुराया’ गाण्याची जोरदार चर्चा Top 10 News:
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा पहिला म्युझिक अल्बम ‘बाप विठुराया’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सारेगम मराठीच्या वारी स्पेशल या गाण्यात रिंकूचा नवा आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळणार आहे. हे भक्तिगीत गायक अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात साकारले आहे. विठ्ठलावरील आपली श्रद्धा आणि या गाण्याशी असलेले भावनिक नाते रिंकूने व्यक्त केले असून, हा तिच्या कारकिर्दीतील पहिलाच अल्बम असल्याने तो तिच्यासाठी अत्यंत खास असल्याचे तिने सांगितले आहे.




