Top 10 News : एकनाथ शिंदे-अमित शाह यांच्यात भेट, जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आणि ‘जेठालाल’ शो सोडणार?, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिंदेसेनेतील सहा खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

शिंदे-अमित शाह भेट;
विकासकामे, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा
Top 10 News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिंदेसेनेतील सहा खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल भेट घेतली. सुमारे 50 मिनिटे झालेल्या बैठकीत मतदारसंघांतील विकासकामे, केंद्राकडील निधी, लोकसभेतील खासदारांचे विलीनीकरण आणि आगामी मान्सून अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले
सुनील तटकरे, प्रफुल पटेलही बैठकीत उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत आपली कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी केवळ पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बाहेर पडलो. तटकरे आणि पटेल तेथे असल्याची मला माहिती नव्हती,” असे ते म्हणाले. दरम्यान, तिन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, अधिकृत तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
‘मी बीएससी पदवीधर, दहावी-बारावीत चांगले गुण’;
जयराम चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला मकोका न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. 10 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.जामीन अर्जात जयराम चाटेने स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच, जामीन मिळावा यासाठी त्याने दहावी आणि बारावीत चांगले गुण मिळाल्याचे, तसेच आपण बीएससी पदवीधर आणि सुशिक्षित असल्याचे कारण न्यायालयासमोर मांडले. मात्र, मकोका न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत, परीक्षेतील चांगले गुण किंवा उच्च शिक्षण हे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यासाठी ग्राह्य कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने जयराम चाटेचा जामीन अर्ज नामंजूर केला.
विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे;
आजपासून राज्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी
राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता असून हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांतही तुरळक पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हलक्या सरींसह उकाडा कायम राहू शकतो. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तुकाराम मुंढेंचा धडाका!
मुंबईतील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित Top 10 News :
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने भेंडीबाजार व उमरखाडी परिसरातील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. एफडीएच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंट या तीन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, नियमांचे पालन होईपर्यंत संबंधित हॉटेल्सना व्यवसाय करता येणार नाही. या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश एफडीएने दिला आहे.
‘मोदींनी पुतिन यांना अणुहल्ल्यापासून रोखलं’
पोलंडच्या मंत्र्याचा मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर अणुहल्ला करण्यापासून परावृत्त केले, असा दावा पोलंडच्या एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, युद्ध अत्यंत टोकाला पोहोचले असताना मोदींनी पुतिन यांच्याशी थेट संवाद साधून अण्वस्त्रांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला, त्यामुळे मोठा विनाश टळला. यापूर्वी समरकंद शिखर परिषदेत मोदींनी पुतिन यांना “हे युद्धाचे युग नाही” असा संदेश दिला होता. या भूमिकेचे जागतिक स्तरावर स्वागत झाले होते. मात्र, पोलंडच्या मंत्र्यांच्या या दाव्याबाबत भारत, रशिया किंवा अन्य अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
‘पॅराक्वाट’ तणनाशकावर देशभरात तात्काळ बंदी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या पॅराक्वाट* तणनाशकाच्या आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापरावर तात्काळ बंदी घातली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कीटकनाशक कायदा, 1968 अंतर्गत याबाबत अधिसूचना जारी केली. भात व गव्हाच्या पिकांतील तण नियंत्रणासाठी या तणनाशकाचा वापर होत होता. मात्र, विषबाधा आणि मृत्यूच्या घटनांमुळे यावर बंदीची मागणी होत होती. जगातील 70 हून अधिक देशांमध्ये यापूर्वीच पॅराक्वाटवर बंदी लागू करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणचा इशारा;
आखातातून तेल-गॅस निर्यात रोखण्याची धमकी
अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने आखाती प्रदेशातून तेल आणि नैसर्गिक वायूचा “एक थेंबही” बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांवरही दबाव वाढू शकतो. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील काही लष्करी तळांवर अतिरिक्त हवाई हल्ले केल्याने पश्चिम आशियातील तणाव आणखी तीव्र झाला आहे.
अक्षर-वॉशिंग्टनची झुंज;
भारताचा इंग्लंडवर पहिल्या वनडेत विजय
रोहित शर्मा, विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर आणि शुभमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 258 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 45.2 षटकांत 4 गडी गमावून 259 धावांचे लक्ष्य गाठत पहिला एकदिवसीय सामना जिंकला. कर्णधार शुभमन गिल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
‘जेठालाल’ शो सोडणार?
निर्मात्यांचे अफवांवर स्पष्टीकरण Top 10 News :
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी शो सोडणार असल्याच्या चर्चांना निर्मात्यांनी पूर्णविराम दिला आहे. दिलीप जोशी मालिकेतून बाहेर पडणार नसून कथा अद्यापही जेठालालभोवतीच फिरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 28 जुलै रोजी मालिका 18 वर्षे पूर्ण करत असून त्यानिमित्त नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल आणि तारक मेहता नव्या गोंधळात अडकलेले दिसत असून आगामी भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजक असणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.




