TOP 10 News : भाजपचे 3 आमदार फुटले ते कथित फोटोंवर महाजनांचे स्पष्टीकरण; जाणून घ्या आजच्या TOP 10 News…
TOP 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

TOP 10 News : 1. ‘आता फक्त खासदार फोडले, आमदार आणि नगरसेवकही फोडणार’
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी गोरेगावच्या नेस्को येथील शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना ठाकरे गटाला इशारा दिला. ‘आता फक्त खासदार फोडले, यापुढे आमदार आणि नगरसेवकही फोडणार’, असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. शिंदे गटाने ठाकरे गटाचे सहा खासदार फोडले, यावर आरोप-प्रत्यारोप झाले.
याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी, “मी तुम्हाला एक सांगतो सहा खासदारांचं मला माहित नाही. पण, यांचं पोरग माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागलं की ती लोक पैशाच्या भरवशावर फुटले. अरे सोन्या तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते. तेव्हा तुम्ही मंत्री होते. तेव्हा गल्लोगल्ली फिरले असते, आमदारांची नाराजी काढली असती तर ही वेळ आली नसती. हा तर छोटा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचाही मोठा चटका आहे,” असा इशारा पाटील यांनी दिला.
2. ‘महाराष्ट्र आणि शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा’
दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांची मने जिंकली. चंदनशिवे यांनी भाषणादरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट साद घालत मैदानात उतरण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जो संघर्ष करताय तो वाया जाणार नाही.
आता मागे हटायचं नाही, मैदानात उतरून या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काही पाहिलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उश्या सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या आहेत. हृदयाला घाव घातले गेले, टाके उठले गेले, शिवत राहिले, शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती जिद्दीने उभीच राहिली आणि उभी राहणारच असल्याचा आशावाद” नितीन चंदनशिवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात केला.
3. महिलेसोबतच्या कथित फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सदरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आपली बाजू मांडली आहे. बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे स्पष्ट केले. या फोटोत आक्षेपार्ह काय आहे ते कळत नाही. मागचे लोक कट करून मॉर्फ केलेले ते फोटो आहेत.
दरम्यान, संबंधित छायाचित्रे बनावट तसेच बदनामीच्या उद्देशाने प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव येथे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतही तक्रार केली आहे. प्राथमिक तपासात एका फेसबुक खात्याद्वारे मंत्री गिरीश महाजन यांचे एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले छायाचित्र वापरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.. संबंधित सोशल मीडिया खात्याचा तसेच पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
4. चर्चा निष्फळ! मुंबईची BEST बससेवा आजही ठप्पच
मुंबईतील BEST कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. परिणामी आज देखील मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. एरवी मुंबईच्या रस्त्यांवर दररोज सुमारे 2, 766 बस धावणाऱ्या BEST कडून शुक्रवारी दिवसभरात अवघ्या 48 बस चालवण्यात आल्या. तर चालवण्यात आलेल्या 48 गाड्यांपैकी 9 गाड्या BEST च्या मालकीच्या तर 39 गाड्या वेट-लीजवरील होत्या.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली होती. 12 संघटनांच्या कृती समितीने ही बैठक सकारात्मक झाल्याचे म्हटले असले, तरी ती निष्फळ ठरल्याचा दावा करत रात्री साडेनऊ वाजता संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली. दरम्यान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी, बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करणे, सुधारित वेतन करार यांसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
5. जुन महिना कोरडाच? बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत
जुन महिन्यातही राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची उष्णता वाढली आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पेरण्या रखडल्या असून, शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र आता जुलै महिन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरबी समुद्रात मॉन्सून एकाच जागी रेंगाळला असून, राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता आणखी काही दिवसाचा कालावधी लागणार आहे. आज राज्यात उष्णता वाढण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा, कोकणात उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मॉन्सूनने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये प्रगती केली. त्यानंतर बुधवारी देशभरातील मॉन्सूनची वाटचाल स्थिर होती. ज्यामुळे राज्यात 1 जुलैनंतर राज्यात पावसाला सुरूवात होण्याचा अंदाज आहे.
6. भाजपचे 3 आमदार फुटले! केंद्रीय नेतृत्वाकडून गंभीर दखल
कर्नाटक विधान परिषद (एमएलसी) निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंगमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली असून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह पक्षातील प्रमुख नेत्यांना २३ जून रोजी दिल्ली येथे स्पष्टीकरणासाठी पाचारण केल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे थिप्पन्नप्पा कमकनूर, पी. व्ही. मोहन, बी. के. हरिप्रसाद, शिवण्णा बी. एस. आणि विनय कार्तिक प्रकाश हे पाच उमेदवार विजयी झाले. भाजपचे लिंगराज पाटील आणि रघू आर. यांना विजय मिळाला, मात्र जेडीएसचे एकमेव उमेदवार गोविंदराजू यांचा पराभव झाला. निवडणुकीच्या निकालांनुसार काँग्रेसला एकूण १५१ मते मिळाली. पक्षाच्या संख्याबळानुसार अपेक्षित मतांपेक्षा तब्बल ११ मते अधिक मिळाल्याने भाजप आणि जेडीएसमधील काही आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
7. ‘टेलिग्राम’वरील बंदी कायम! तात्पुरत्या निर्बंधाची कारवाई चुकीची नाही
नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयाने मान्यता दिली. टेलिग्राममधील मोठ्या प्रमाणावर सामग्रीचे स्वयंचलित प्रसारण करण्याची क्षमता पाहता, सरकारचे हे पाऊल योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांनंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
न्यायालयाने टेलिग्रामची याचिका फेटाळताना म्हटले की, देशाची सार्वभौमता, अखंडता, संरक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला ऑनलाइन माहिती ब्लॉक करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल सर्वात कमी निर्बंध लादणारी योग्य उपाययोजना आहे.
8. ‘कुणासमोर भीक मागत नाही’; मेलोनींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्यासोबत एक फोटो काढण्यासाठी भीक मागितली, असं वक्तव्य यांनी केलं होतं. त्यावर आता मेलोनी यांनी प्रत्युत्तर दिलं. खोट्यालाही काही मर्यादा असतात, इटली कुणासमोर भीक मागत नाही, अशा शब्दात मेलोनी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर इटलीने त्यांचा अमेरिकाचा दौराही रद्द करत नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मेलोनी यांनी सांगितलं की, “असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु हे अत्यंत लज्जास्पद आहे. काही गोष्टींना उत्तर देणं गरजेचं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान पूर्णपणे खोटं आहे. जेवढी सक्ती आणि कठोरपणा ट्रम्प आपल्या मित्र देशांच्या विरोधात दाखवतात, तेवढीच ठाम भूमिका ते पाश्चात्य देशांचे विरोधक आणि अमेरिकेच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांसमोर का दाखवत नाही?,” असा सवालही त्यांनी केला.
9. गोलंदाज हर्षित राणासाठी नियमात बदल?
वेगवान गोलंदाज हर्षित राणाला गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर थेट भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान देण्यात आले आहे. शनिवारी होणाऱ्या अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी तो उपस्थित राहणार आहे. हर्षितने ‘बीसीसीआय’च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून तो आता चेन्नई येथे भारतीय एकदिवसीय संघात दाखल झाला आहे, असे ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सचिव देवजित सैकिया यांनी नमूद केले.
परंतु बीसीसीआयने यापूर्वी दुखापतीतून परतणाऱ्या खेळाडूंसाठी देशांतर्गत सामना किंवा ‘अ’ संघासाठी खेळणे बंधनकारक केले होते. मात्र, २४ वर्षीय हर्षितला थेट राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आल्याने या नियमाबाबतच प्रश्न निर्माण केले जात आहे. दरम्यान, हर्षितने अखेरचा स्पर्धात्मक सामना पाच महिन्यांपूर्वी खेळला होता. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आयपीएल स्पर्धेला खेळात आले नाही.
10. पांढरा घोडा, नऊवारी साडी…अश्विनी महांगडेचा राजेशाही लुक
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीआहे. तिच्या पारंपरिक लुकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. अश्विनीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान करून मराठमोळा लुक साकारला आहे. या साडीमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. यासोबतच दागिन्यांमुळे तिच्या संपूर्ण लुकला एक राजेशाही स्पर्श मिळाला आहे.
या फोटोशूटमध्ये पांढऱ्या घोड्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फोटो वेगळेपणा अधिक जाणवते. हे फोटो शेअर करताना अश्विनीने, “आप अपनी कहानी के मुख्य पात्र हैं” असे कॅप्शनही दिले आहे. तिचा हा लुक चाहत्यांना विशेष भावला आहे. हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा:







