TOP 10 News: “ही तर फक्त सुरुवात…” तुकाराम मुंढेंचा इशारा ते काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; जाणून घ्या TOP 10 News
TOP 10 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोड...

TOP 10 News: 1. विजय वडेवट्टीवार यांना शिवसेनेची ऑफर? म्हणाले…
मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला आहे. परंतु काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करता आहेत, असं विजय वडेवट्टीवार म्हणाले. याद्वारे वडेट्टीवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे.
2. MPSCपरीक्षेबाबत मोठा निर्णय! 21 दिवसांत निकाल
एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्व परीक्षा आता ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांऐवजी संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या सुधारणांमुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करणे आयोगाला शक्य होणार आहे. दरम्यान, ही सीबीटी (CBT) पद्धत केवळ आणि केवळ पूर्व परीक्षांसाठीच लागू असणार आहे. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ किंवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक आणि ठरलेल्या पद्धतीनेच पार पडतील.
3. पुढील 48 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी
संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण ते विदर्भ पावसाचा जोर असून हवामान विभागाने आज पुन्हा 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ताशी 30-50 किमीचा वारा आणि विजांसह पुढील 48 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागातही पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
4. खासदारांनंतर आता आमदारही फुटणार; शिंदेंच्या नेत्याचा दावा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार फुटल्यानंतर आता आमदारही फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘ऑपरेशन टायगर ३.०’ सुरू झाले असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे २० पैकी १४ आमदार संपर्कात आहेत. ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील, असे सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील मविआच्या बैठकीला ६० आमदारांपैकी ३७ आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी असे कोणतेही ऑपरेशन सुरू नाही, मात्र मविआचे अनेक आमदार स्वतःहून शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत, असे सांगितले.
5. तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, “ही तर फक्त सुरुवात…”
अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळखोरांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई केवळ आत्ता सुरुवात असून, ती आणखी तीव्र कारवाई केली जाईल, असा कडक शब्दांत इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दिला आहे. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांतून जोरदार स्वागत होत असून, त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होऊन त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध, पनीर, अवैध गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, असे सांगत तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक आरोग्य ही केवळ नियामक जबाबदारी नसून, मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी असल्याचा संदेश दिला आहे.
6. राम मंदिरातील देणगीच्या चोरी प्रकरणी 8 जणांना अटक
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून मिळालेल्या देणगीच्या चोरी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत ७९.८५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली. अटकेतील 5 ते 6 जण बँक कर्मचारी आहेत. ते मंदिरातील दान रक्कम मोजण्याच्या कामावर नियुक्त होते. मंदिरातील बाथरूममध्ये नोटांची बंडले लपवून नंतर ते गायब केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. गुप्त कॅमेऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांकडून कथित चोरीचा कट उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, “विशेष तपास पथकाचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी कारवाई केली. जनतेच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल,” असे सांगितले आहे.
7. काँग्रेसमध्ये फेरबदल; संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशा या राज्यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. या बदलानुसार, राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेश, लालजी देसाई यांच्याकडे ओडिशा आणि संजय दत्त यांच्याकडे हरयाणाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. राजेंद्र पाल गौतम हे दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिले असून सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशातील दलित आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी काँग्रेसने ही रणनीतिक नियुक्ती केल्याची चर्चा आहे. तर हरयाणात संजय दत्त आणि ओडिशात लालजी देसाई यांची नियुक्ती करून काँग्रेसने संघटन विस्ताराला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
8. सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं
चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘सिटिक टॉवर’ला एक विमान धडकले. बीजिंगच्या गुओमाओ भागात असलेली ही १०९ मजली इमारत ‘चायना जून ‘ या नावानेही ओळखली जाते. या घटनेत इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि विमानाचे अवशेष जमिनीवर पडल्याचे दृश्य एका व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विमान टॉवरच्या एका भागावर आदळताना दिसत आहे. विमानाच्या धडकेमुळे इमारतीच्या दोन खिडक्या फुटल्या असून विमान आदळताच त्याचे दोन तुकडे झाले. विमानाचे अवशेष जमिनीवर पडताच विखुरलेल्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने या अपघातातील जीवितहानीची संख्या अद्याप निश्चित केलेली नाही, तसेच विमानात असलेल्या व्यक्तींविषयीही कोणतीही माहिती दिलेली नाही.
9.FIFA WCमध्ये केप व्हर्डेने रचला इतिहास; ठरला पहिलाच देश
पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला केप व्हर्डे देश राऊंड ऑफ-३२ साठी क्वालिफाय झाला आहे. स्पेनला एकही गोल करू न दिलेल्या व्होझिन्या आणि पहिल्याच सामन्यातील संघाच्या कामगिरीमुळे केप व्हर्डे देश चर्चेत आला. आता संघाने पुढील फेरीत स्थान मिळवलं असून तिथे त्यांचा सामना वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाशी होणार आहे. हा सामना ४ जुलै रोजी मियामी येथे खेळवला जाणार आहे. ह्यूस्टनमध्ये केप व्हर्डेने सौदी अरेबियाला गोलशून्य बरोबरीत रोखत इतिहास घडवला. दरम्यान, अवघ्या ५६ वर्षीय प्रशिक्षक बुबिस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा केप व्हर्डेचा संघ विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचणारा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटा देश ठरला.
10. ‘मुलांच्या कृत्यांसाठी पालकांना जबाबदार धरणे योग्य नाही’
लोहगड येथील केतन अग्रवालची हत्या प्रकरणात 20 वर्षीय त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणावर यावर अभिनेत्री व खासदार कंगना रणावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी पालकांना दोष देता येणार नाही. कारण आजच्या काळात लोक वेगवेगळी आयुष्ये जगत असतात. स्वतःची आदर्श प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि खरा स्वभाव कसा आहे किंवा त्यांची स्वतःची काय मत आहेत? यापेक्षा इतरांच्या नजरेत ते कसे दिसतात, याला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे मुलांच्या कृत्यांसाठी त्यांच्या कुटुंबाला किंवा पालकांना जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही,” असे कंगना यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे. TOP 10 News
हेही वाचा:







