विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट Top 10 News: विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केलीय.उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचं दिसून येतंय. एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. तर अद्याप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजूनही उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली नाहीत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.या दोघांच्या वर्षा बंगल्यावर पाऊणतास झाली चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत माजी आमदार झीशान सिद्दिकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात- राज ठाकरे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य निर्णयाच्या या भूमिकेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.जिथली माती भुसभुशीत असते तिथे घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र येऊन खडकासारखं कडक उभं राहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो. पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैया यांना मराठी शिकवायचं चालले आहे. भैयांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैया दिसतील. त्यांची राज्य सुधारली नाहीत याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे प्रश्न कुणी विचारत नाही. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळा महाराष्ट्रात येऊनच तुम्हाला धमकी दिली जाणार. त्यावर आमचे राज्यकर्ते हात चोळत बसणार. कोणाच्या दबवाखाली? सगळेजण बॅकफूटवर का खेळतात? ते मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये असं कुणाची बोलायची हिंमत आहे का? पण त्यांच्यावर त्याप्रकारचा दबावच नाही, असं राज ठाकरे म्हणले. कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढलं मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विषारी अथवा रासायनिक पदार्थामुळे मृत्यू झाल्याच्या शक्यतेची डॉक्टरांकडून तपासणी सुरू आहे. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेच हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत आहे. चौघांची स्थिती ही अन्नातून होणाऱ्या विधबाधेपेक्षा खूपच खराब होती, असं डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. रोबोटीक वॉटर क्राफ्टने दोन पर्यटकांचा जीव वाचवला Top 10 News: काशीद समुद्र किनाऱ्या बुडत असलेल्या दोन पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या मदतीने त्यांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रोबोटीक तत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात पहिल्यांदाच दोघांचा बचाव करण्याची ही पहिलीच घटना आहे. डोंबिवलीवरून फुरकन शेख आणि कैफ शेख काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पण पाण्याच अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. काही क्षणात रोबोटीक वॉटर क्राफ्ट दोघांपर्यंत पोहोचली. रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या साह्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं जातंय. बंगालमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काल मतदान प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात मतदानाची एकूण आकडेवारी 92 टक्क्यांहून अधिक होती. त्यामुळे, पश्चिम बंगालमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असल्याचं राजकीय तज्ञाचं मत आहे. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते, प. बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला 146 ते 161 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवरच थांबावे लागणार असल्याचे दिसून येते. तर, काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. बंगालमध्ये यंदा भाजपला 42 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर टीएमसीच्या पारड्यात 40 टक्के मतं पडतील. त्यामुळे, एक्झिट पोलनुसार दोन्ही पक्षांमध्ये तगडी टक्कर असून भाजपची आघाडी होत असल्याचा अंदाज आहे. महामार्गावर अपघाताचा थरार, २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू मध्य प्रदेशमध्ये बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये २ लहान मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला.या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या १२ जणांनी जागीच प्राण सोडले. मृतांमध्ये २ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपाघातानंतर घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मजूर बसले होते. अंदाजे ३० ते ३५ मजूर या पिकअपमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे. भरधाव पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्याच्या मधोमध उलटला. या अपघातामध्ये पिकअपमधील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. यातच काही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. किंग चार्ल्स यांच्या ट्रम्पना कोपरखळ्या किंग चार्ल्स सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये किंग चार्ल्स यांच्यासाठी विशेष मेजवानी ठेवण्यात आली होती. यावेळी बोलताना चार्ल्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. ब्रिटन नसते तर अमेरिकन नागरिक आज फ्रेंच भाषेत बोलत असते, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. यावेळी चार्ल्स यांनी युरोपच्या अमेरिकेवरील अवलंबित्वाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला. दुसरीकडे किंग चार्ल्स यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले. काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणाबद्दल मी चार्ल्स यांचे अभिनंदन करतो. त्यांनी चक्क डेमोक्रॅट्सना उभे राहायला लावले, जे मला कधीच जमले नाही,” असे मिश्किलपणे ट्रम्प म्हणाले. मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पुन्हा पराभव सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सला आयपीएल 2026 च्या 41 व्या सामन्यात 6 विकेटनं पराभूत केलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 243 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा सनरायजर्स हैदराबादनं यशस्वीपणे पाठलाग केला आहे.मुंबई इंडियन्ससाठी रियान रिकल्टन यानं शतक केल्यानं मुंबईनं 5 बाद 243 धावा केल्या. 244 धावांचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादनं दमदार कामगिरी केली. पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडनं 129 धावांची भागीदारी केली. ट्रेविस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादनं 8 बॉल शिल्लक ठेवत विजय मिळवला.दरम्यान, मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद या विजयासह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ पोस्टरनं धडधड वाढली Top 10 News: झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलाय. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय, ते बघून घाबरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आलीय. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय. पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.