Top 10 News: राज्यात मान्सून सक्रीय!, गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ आणि अलका याज्ञिक यांची अवस्था पाहून चाहते चिंतेत , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवारपासून मान्सूनने आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली.

राज्यात मान्सून सक्रीय!
२९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
Top 10 News: राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवारपासून मान्सूनने आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली. गेले २ दिवस सुरु असलेली पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. गेले कित्येक दिवस नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पावसाच्या सरींनी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ;
परप्रांतीय ओला चालकाला अटक
राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे.
विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त,
रवींद्र सिंघल यांची ACB मध्ये बदली
महाराष्ट्र पोलीस दलातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे डॅशिंग आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. गृह विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून, या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. या बदली प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांची परस्परांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे.विश्वास नांगरे पाटील हे आपल्या शिस्तबद्ध आणि धडक कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी यापूर्वी आपल्या कामाचा धडाका दाखवला आहे. उपराजधानी नागपूरमधील गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाला एक नवे आणि गतिमान नेतृत्व लाभले आहे.
तुकाराम मुंढे अजून थोडं चांगलं वागले तर…
बच्चू कडू यांच्याकडून कौतुक
“तुकाराम मुंढे अजून थोडं चांगलं वागले तर, दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना तिथं ठेवायला पाहिजे. माझ्या भागात गुटखा विक्री बंद झाली. सरकार जे करु शकत नाही ते एक अधिकाऱ्याने करुन दाखवलं, खेड्या-गावातील गुटखा विक्री बंद झाली, मी त्यांचे आभार मानतो”, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी काल विधानपरिषदेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले. तसेच, मुंढेंना दुधाच्या भेसळीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन कडू यांनी सभागृहात बोलताना केली. सरकार आमचं-तुमचं सगळ्यांचं आहे. पण, अजूनही दुधातील भेसळ कमी झाली नाही, त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण १० ते १५ टक्के वाढले आहे”, असे कडू म्हणाले. “सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा, असे म्हणणाऱ्यातील आम्ही नाही, एक शेतकरी पूत्र म्हणून आम्ही इथं बोलतोय”, असेही कडूने पुढे स्पष्ट केले.
मुंबई आणि पालघरला पावसाचा रेड अलर्ट
लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
तब्बल 15 दिवस उशिराने आलेल्या पावसाने गेल्या काही तासांमध्ये मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईला झोडपून काढले आहे. हवामान खात्याने मंगळवारी मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पावसाने मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात चांगलाच जोर धरला होता. मंगळवारी रात्रीपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर वसई, विरार आणि पालघरलाही पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे मुंबईत नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन 15 ते 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे आज ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांनाचा प्रवास खडतर ठरणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेकडून ट्विट करुन येत्या काही तासांमध्ये मुंबई आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका;
बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला यूके न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. लंडन हायकोर्टाने ‘बँक ऑफ इंडिया’च्या बाजूने निकाल देताना, नीरव मोदीला बँकेचे १०.७ दशलक्ष डॉलर्सचे (जे १०० कोटी रुपयांहून अधिक आहेत) कर्ज परत करण्यास जबाबदार धरले आहे. मंगळवारी निकाल देताना लंडन कमर्शियल कोर्टाचे न्यायाधीश सायमन टिंकलर यांनी स्पष्ट केले की, नीरव मोदीने बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती आणि आता तो ती रक्कम परत करण्यास कायदेशीररित्या बांधील आहे.न्यायालयाने यावेळी नीरव मोदीकडे सुमारे सुमारे ३८.९ कोटी रुपये इतकी मूळ कर्ज रक्कम देणे बाकी आहे. याव्यतिरिक्त, बँकेच्या अटींनुसार या रकमेवर व्याजही आकारले जाईल असे सांगितले आहे. नीरव मोदीने न्यायालयात बँकेच्या दाव्याला आव्हान दिले होते. त्यावर ही सुनावणी करण्यात आली.
भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार;
माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ
महाराष्ट्रानंतर आणखी एका भाजपशासित राज्यात मोठी उलथापालथ होणाची शक्यता आहे. थेट मुख्यमंत्री बदलाची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे एक नाही तर तब्बल तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा विरोधी पक्षांमध्ये जोरदार सुरू आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे सध्या जमिनीच्या वादात अडकले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्याचवेळी त्यांना विरोधी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोहन यादव यांच्या समर्थनार्थ निवेदन जारी केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपशासित राज्यातील तीन मुख्यमंत्र्यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अखिलेश यादव यांच्या दाव्यामुळे फक्त उत्तर प्रदेशसह आणखी दोन राज्यातील राजकारण तापलंय.
एलॉन मस्क यांना मोठा आर्थिक धक्का;
एका दिवसात १४६ अब्ज डॉलर्सची संपत्ती घट
जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल १४६ अब्ज डॉलर्सची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ९५७ अब्ज डॉलर्सवर आली आहे. विशेष म्हणजे, हा तोटा Warren Buffett यांच्या आयुष्यभराच्या एकूण कमाईपेक्षाही जास्त असल्याचे म्हटले जात आहे. मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या विक्रमी वाढीमागे SpaceX च्या ऐतिहासिक आयपीओची मोठी भूमिका होती. कंपनीचे मूल्यांकन २ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्यानंतर मस्क यांची संपत्ती एकावेळी १.२७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. मात्र, आता त्यात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे तीन विक्रम…
पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय
ख्रिस्तियानो रोनाल्डो जेव्हा जोमाने खेळतो, तेव्हा एक नव्हे तर अनेक विक्रम त्याच्या पायाशी लोटांगण घालतात.. हेच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे मैदान गाजवत असताना रोनाल्डोला फार काही चमक दाखवता आली नव्हती आणि त्यामुळे चाहते निराश होते. पण, त्याने सर्व उणीव मंगळवारी झालेल्या सामन्यात भरून काढली. त्याने दोन गोल करून पोर्तुगालसाठी महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळ केला. पोर्तुगालने ५-० अशा फरकाने हा सामना जिंकून बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे.तर दुसरीकडे रोनाल्डो हा सहा वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे त्यासोबत पोर्तुगालसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, एकाच सामन्यात दोन गोल करणारा स्पर्धा इतिहासातील वयस्कर खेळाडू आणि पोर्तुगालसाठी वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा तरुण व वयस्कर खेळाडू म्हणून त्याच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आलेत.
अलका याज्ञिक यांना पुरस्कार घेतेवेळी घ्यावा लागला आधार
अवस्था पाहून चाहते चिंतेत Top 10 News:
राष्ट्रपती भवनात काल पद्म पुरस्कार सोहळा पार पडला. नव्वदच्या दशकातील दिग्गज गायिका अल्का याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अल्का याज्ञिक पुरस्कार स्वीकारत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये पुरस्कार स्विकारण्यासाठी अलका याज्ञिक यांच्या नावाची घोषणा केली जाते. त्यावेळी अलका याज्ञिक पुरस्कार स्विकारण्यासाठी आपल्या जागेवरुन उठतात. त्यावेळी त्या सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडल्या. त्यानंतर त्या पुढे पुरस्कार स्विकारण्यासाठी जातात. तेवढ्यात एक नर्स पुढे येऊन त्यांना आधार देते. त्यानंतर पुढे जात अलका याज्ञिक पद्म पुरस्कार स्विकारतात. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून चाहते चिंतेत पडले आहेत.





