Today TOP 10 News: भाजपची कोंडी करण्यासाठी अजित पवारांची काँग्रेसला साद ते आयुष्मान भारत योजनेत 1356 आजार… वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

भाजपची कोंडी करण्यासाठी अजित पवारांची काँग्रेसला साद
सतेज पाटलांशी साधला संवाद? –
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आलाय. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येतेय. या संदर्भात अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून प्राथमिक चर्चा केल्याचे वृत्त आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीशी युती न करण्याची भूमिका घेतल्याने अजित पवारांनी आता जुना मित्रपक्ष काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे दिसते. ‘महायुती’मध्ये असूनही भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि स्थानिक सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी अजित पवारांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जातेय. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले, तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते.
बाहेरच्या लोकांमुळे भाजपचे नुकसान –
मुनगंटीवारांचा घरचा आहेर –
नगरपरिषद निवडणुकीतील अपयशानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षांतर्गत नाराजीला वाट करून दिली आहे. “पक्षात बाहेरून आलेल्या लोकांमुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता आहे,” असे सांगतानाच त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात प्रवेश दिलेल्या एका आमदाराने चक्क सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता, असे मुनगंटीवार म्हणाले. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने विकासाच्या गतीवर परिणाम झाला असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी झेंडा हाती घेतलाय; परंतु ज्यांना संघाचा विचारच मान्य नाही, अशांना पक्षात स्थान दिल्याने निवडणुकांवर विपरीत परिणाम होतोय,” अशी तोफ त्यांनी डागली.
मुंबईत ठाकरे-राज युतीची मोर्चेबांधणी –
जागावाटप अंतिम टप्प्यात –
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युती आता निश्चित मानली जात आहे. ‘मातोश्री’वर झालेल्या मॅरेथॉन बैठकीत शिवडीतील जागावाटपाचा तिढा सुटला असून, दोन जागा ठाकरे गटाला तर एक मनसेला देण्यावर एकमत झाले आहे. दादर, माहीम आणि भांडुपमधील जागांसाठी चर्चा सुरू असून लवकरच भव्य मेळाव्यात युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. “माणिकराव कोकाटेंना सहा तासांत दिलासा मिळतो, मात्र ४० आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित राहतो,” अशी टीका त्यांनी केली. भाजपचा विजय हा पैशांच्या जोरावर असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयीन विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा –
आमदारकीवरील संकट टळले –
नाशिक येथील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, यामुळे त्यांची आमदारकी तुर्तास सुरक्षित झालीय. तीन दशकांपूर्वीच्या या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंना दोषी ठरवले होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती. मात्र, ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. “शिक्षा म्हणजे बदला नसून सुधारण्याची संधी असते,” असे महत्त्वपूर्ण भाष्य करत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावलीय. या निर्णयामुळे कोकाटेंचे राजकीय भवितव्य तुर्तास सावरले असल्याचे दिसते.
लवासा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा दिलासा –
हायकोर्टाकडून जनहित याचिका फेटाळली –
लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पात सत्तेचा गैरवापर आणि आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप करणारी जनहित याचिका पुराव्याअभावी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. लवासा हा देशातील पहिला खासगी हिल स्टेशन प्रकल्प असून, तो सुरुवातीपासूनच भूसंपादन आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवरून वादात राहिला आहे. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी फेटाळल्याने पवार कुटुंबावरील कायदेशीर टांगती तलवार आता दूर झाली आहे.
आयुष्मान भारत योजनेत १३५६ आजार –
५ लाखांपर्यंत मोफत उपचार –
राज्यातील नागरिकांना आरोग्य सुरक्षा देण्यासाठी ‘आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ आता एकत्रित राबवण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार असून, यात १३५६ गंभीर आजार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवली असून, आता केशरी, पिवळ्या व पांढऱ्या रेशनकार्डधारकांसह नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि पत्रकारांनाही याचा लाभ घेता येईल. लाभार्थ्यांनी आपले ‘आयुष्मान कार्ड’ काढण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्डसह ‘आपले सरकार’ केंद्रावर संपर्क साधावा किंवा ‘आयुष्मान ॲप’द्वारे ई-केवायसी करावे. सर्व सरकारी आणि योजनेच्या पॅनेलवर असलेल्या खासगी रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध आहे.
५० लाख गमावले, मृत्यूशी झुंज दिली –
अमेरिकेच्या ‘डंकी’ मार्गाचे भयावह वास्तव –
अमेरिकेला जाण्याच्या नादात हरियाणाच्या योगेशला १६८ दिवसांचा नरकप्रवास सहन करावा लागला. ५० लाख रुपये देऊनही अखेर त्याला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले आहे. एजंटांनी योगेशला पनामाच्या घनदाट जंगलातून, चिखल आणि कीटकांच्या वाटेने नेले. एके-४७ घेतलेल्या तस्करांनी त्याला ओलीस ठेवून ३२ लाख रुपये उकळले. कंटेनरमध्ये ४०-५० लोकांसोबत १७ तास गुदमरवणारा प्रवास केल्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी त्याने अमेरिकेत प्रवेश केला. मात्र, तिथे पोहोचताच त्याला अटक झाली. ८ महिने तुरुंगात काढल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्याला हद्दपार करण्यात आले. जीव धोक्यात घालून आणि पैसे गमावून योगेश आता पुन्हा शून्यावर उभा आहे.
H1B व्हिसाचे नियम कडक –
शेकडो भारतीय कर्मचारी मायदेशात अडकले –
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन व्हिसा नियमांत अचानक बदल केल्यामुळे शेकडो भारतीय व्यावसायिक भारतात अडकून पडलेत. १५ ते २६ डिसेंबर दरम्यान नियोजित असलेल्या व्हिसा मुलाखती अचानक रद्द करून मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात. नवीन नियमांनुसार आता अर्जदारांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची आणि सुरक्षिततेची सखोल तपासणी केली जातेय. सुट्यांच्या काळात व्हिसा नूतनीकरणासाठी आलेल्या भारतीयांसमोर आता नोकरी टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकलेय. गुगल आणि ॲपलसारख्या कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना परदेश प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. या अनिश्चिततेमुळे अमेरिकेत स्थायिक असलेल्या अनेक भारतीयांच्या घरांचे हप्ते आणि नोकऱ्यांवर टांगती तलवार आलीय.
भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब –
कीवी, सफरचंद आणि लोकर होणार स्वस्त –
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला अंतिम मंजुरी मिळाली असून, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. १० वर्षांपासून रखडलेला हा करार अवघ्या ९ महिन्यांच्या चर्चेनंतर मार्गी लागलाय. या करारानुसार, न्यूझीलंडमधून भारतात येणाऱ्या ९५% वस्तूंवरील आयात शुल्क कमी करण्यात आले असून, निम्म्याहून अधिक उत्पादने उद्यापासून शुल्कमुक्त मिळतील. याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना होणार असून कीवी, सफरचंद, लोकर, लाकूड आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत मोठी घट होईल. २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज लक्षात घेऊन न्यूझीलंडने ही मोठी व्यापार भागीदारी केलीय.
क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर बनला बापमाणूस –
पत्नी मितालीने दिला मुलाला जन्म –
भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आणि त्याची पत्नी मिताली पारुळकर यांना पुत्ररत्न प्राप्त झालेय. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी शार्दुलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. मितालीच्या गरोदरपणाची बातमी त्यांनी नऊ महिने गुप्त ठेवली होती, ज्यामुळे चाहत्यांसाठी हे एक सुखद धक्का ठरलाय. शार्दुल आणि मिताली २७ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाहबंधनात अडकले होते. मिताली ठाण्यात स्वतःची ‘ऑल जॅझ बेकरी’ चालवते. व्यावसायिक आघाडीवर, शार्दुल आगामी आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना दिसणार आहे. लखनौ संघातून ट्रेडद्वारे तो पुन्हा आपल्या घरच्या संघात परतलाय.
‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर धमाका –
८०५ कोटींच्या कमाईसह नवा विक्रम –
रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केलीय. प्रदर्शनाच्या अवघ्या १७ दिवसांत या चित्रपटाने जगभरात ८०५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, हा रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. त्याने ‘पद्मावत’चा ५७२ कोटींचा विक्रम मोडीत काढलाय. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर’ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने विकी कौशलच्या ‘छावा’ला (७९७ कोटी) मागे टाकले असून, आता त्याचे लक्ष्य ‘कांतारा: द लीजेंड’च्या ८५० कोटींच्या विक्रमावर आहे. दरम्यान, ‘धुरंधर २’ ची घोषणा झाली असून हा भाग १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.





