केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? फडणवीसांनी मांडले सविस्तर चित्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरीव तरतूद मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे सांगत त्यांनी राज्याला मिळालेल्या विविध निधींचा पाढा वाचला. यंदा कर वाटप सूत्रानुसार महाराष्ट्राला विक्रमी ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी ६१०३ कोटी आणि मुंबई मेट्रोसाठी १७०२ कोटींची तरतूद करण्यात आलीय. याव्यतिरिक्त पुणे मेट्रो, ग्रामीण रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी स्वतंत्र निधी मिळालाय. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद कॉरिडॉरच्या घोषणांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना वेग येईल. शहरीकरण आणि ग्रोथ हब्सवर दिलेल्या जोरामुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. अजितदादा विलीनीकरणाची गोष्ट माझ्यापासून लपवतील का? फडणवीसांचा शरद पवारांना सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या दाव्यावरून राजकारण तापलेय. १२ फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार होते, या शरद पवारांच्या दाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे इन्कार केला. अजित पवार आणि माझ्यात तासनतास चर्चा होत असे, मात्र त्यांनी विलीनीकरणाबाबत कधीही शब्द काढला नाही, असे फडणवीस म्हणाले. विलीनीकरण करायचे असेल तर अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडावे लागले असते, असा तांत्रिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वास महायुतीचा पाठिंबा असल्याचे सांगत, त्यांनी शरद पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावलेत. मध्यमवर्गीयांना कररचनेत दिलासा नाही; पायाभूत सुविधा आणि आरोग्यावर भर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत ८५ मिनिटांचे भाषण करत सलग नववे केंद्रीय बजेट सादर केले. यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न केल्याने करदात्यांच्या पदरी निराशा पडली असली, तरी आरोग्य क्षेत्रात सरकारने मोठी तरतूद केलीय. कॅन्सरच्या १७ अत्यावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली असून, देशात ३ नवीन आयुर्वेदिक एम्स रुग्णालये उभारले जातील. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १२.२ लाख कोटी रुपयांचा विक्रमी भांडवली खर्च निश्चित करण्यात आला असून, ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि नवीन मालवाहू मार्गिकांची घोषणा करण्यात आलीय. सेमीकंडक्टर मिशन २.० आणि १०,००० कोटींची ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना उद्योगांना नवसंजीवनी देईल. ७% विकास दरासह ‘विकसित भारत’चे ध्येय गाठण्यासाठी तंत्रज्ञान आणि उत्पादनावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केलेय. काय स्वस्त आणि काय महाग? कर्करोगाची औषधे आणि गॅझेट्स होणार स्वस्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला आरोग्यापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत अनेक आघाड्यांवर दिलासा मिळालाय. सरकारने कर्करोगाच्या १७ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे रद्द केल्याने उपचार स्वस्त होणार आहेत. यासोबतच मायक्रोवेव्ह ओव्हनचे सुटे भाग आणि लिथियम बॅटरी निर्मितीचा कच्चा माल करमुक्त केल्याने स्मार्टफोनसह इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी सोलर ग्लासवरील शुल्कही हटवण्यात आले आहे. परदेशातून वैयक्तिक वापरासाठी मागवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने परदेशी वस्तू प्रेमींना मोठा फायदा होईल. विमान प्रवास आणि चामड्याच्या वस्तूही सुट्या भागांवरील सवलतीमुळे स्वस्त होऊ शकतात. विरोधकांचा टीकेचा भडिमार ; ‘निराशाजनक’ अर्थसंकल्प असल्याची टीका केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पात तरुणांच्या रोजगारासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचे सांगत ‘उत्पादन क्षेत्र घसरत’ असल्याचे ताशेरे ओढले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला ‘विस्कळीत अर्थसंकल्प’ संबोधून रेल्वे कॉरिडॉरचे दावे खोटे असल्याचे म्हटले. अखिलेश यादव यांनी हा अर्थसंकल्प केवळ पाच टक्के लोकांसाठी असून गरिबांच्या समजेपलीकडचा असल्याचे नमूद केले. मल्लिकार्जुन खरगे यांनी सामान्य जनतेच्या पदरी निराशा पडल्याचे सांगितले. दुसरीकडे, रामदास आठवले आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याला ‘क्रांतिकारी आणि प्रगतीशील’ अर्थसंकल्प मानले असून, सामाजिक व आर्थिक न्यायाची सांगड घातल्याचा दावा केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहांची घोषणा; तरुणांना रील आणि ॲनिमेशनचे प्रशिक्षण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान आणि रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केलेय. यंदाच्या अर्थसंकल्पात १५ हजार शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून, याद्वारे तरुणांना रील आणि ॲनिमेशनचे प्रशिक्षण देऊन गेमिंग क्षेत्रात १० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महिला सक्षमीकरणासाठी ‘शी-मार्ट’ (SHE-Mart) आणि प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वसतिगृहांची घोषणा करण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांसाठी प्राप्तिकर मर्यादेत बदल नसला तरी ईपीएफ (EPF) वेतन मर्यादा २५ हजारांपर्यंत वाढवली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी ७.८ लाख कोटींची तरतूद असून मुंबई-पुणे यासह सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलीय. शेतकऱ्यांसाठी ‘भारत विस्तार’ हे एआय टूल आणि पीएम-किसानचा हप्ता कायम ठेवल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. बजेटचा बाजाराला फटका; सेन्सेक्स 1546 अंकांनी कोसळला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रविवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये (STT) करण्यात आलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. परिणामी, सेन्सेक्स १,५४६ अंकांनी घसरून ८०,७२२ वर, तर निफ्टी ४९५ अंकांनी कोसळून २४,८२५ वर बंद झाला. अर्थमंत्र्यांनी फ्युचर्सवरील टॅक्स ०.०२ टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांपर्यंत वाढवल्याने बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. या घसरणीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक फटका बसला असून हे क्षेत्र ६ टक्क्यांनी खाली आले. एसबीआय, बीईएल आणि अदानी पोर्ट्स यांसारख्या दिग्गज समभागांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महागाईचा फटका; सिगारेट आणि गॅस महागला आज, १ फेब्रुवारीपासून देशात सहा मोठे बदल लागू झाले असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर ४० टक्के जीएसटी लागू केल्यामुळे सिगारेटच्या किमतीत १५ ते ४० टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झालीय. सोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे, नवीन वाहनांच्या फास्टॅगसाठी आता ‘केवायव्ही’ पडताळणीची सक्ती हटवण्यात आलीय. तसेच विमान इंधनाचे दर कमी झाल्याने तिकीट दर घटू शकतात. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात मालमत्ता व्यवहारांसाठी आधार बायोमेट्रिक अनिवार्य झाले असून, रिझर्व्ह बँक आगामी बैठकीत व्याजदर कपात करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी चार राऊंड गोळीबार केल्याने खळबळ उडालीय. ही घटना पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली असून, घटनेनंतर तातडीने पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनेक सेलिब्रिटींचे वास्तव्य असलेल्या या उच्चभ्रू परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय. अद्याप कोणत्याही टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यापूर्वी सलमान खान आणि कपिल शर्मा यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या व हल्ल्यांना सामोरे जावे लागलेय. सध्या रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पाकिस्तानी फिरकीपटू तारिकच्या ॲक्शनवरून वाद; कॅमेरून ग्रीनकडून ‘चिटिंग’चा आरोप ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक आपल्या संशयास्पद गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. उस्मानच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमेरून ग्रीनने संताप व्यक्त करत मैदानावरच ‘चेंडू फेकण्याची’ नक्कल केली. ग्रीनच्या या कृतीमुळे तारिक चेंडू ‘फेकत’ असल्याच्या चर्चेला उधाण आलेय. उस्मान तारिकची ॲक्शन मलिंगा आणि केदार जाधवांसारखी बाजूने हात आणून चेंडू टाकण्याची आहे. आयसीसीने यापूर्वी त्याची ॲक्शन दोनदा वैध ठरवली असली, तरी ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याच्यावर ‘चिटिंग’चा आरोप केला आहे. प्रत्युत्तरात तारिकने इन्स्टाग्रामवर रडणाऱ्या मुलाचा फोटो शेअर करून ग्रीनची खिल्ली उडवलीय.