नागपूर – जागतिक स्तरावर वाघांच्या संख्येत भारत अव्वलस्थानी असला, तरी वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसागणिक वाढत आहे. सन २०२० ते २०२४ या कालावधीत देशभरात वाघांच्या हल्ल्यात तब्बल ३७८ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात २१८ मृत्यू झाले आहेत. विशेषत: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मृत्यूची आकडेवारी सर्वाधिक आहे. तर मेळघाटात गेल्या तीन वर्षात सहा जणांचे बळी गेले आहेत. राज्यात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, मेळघाट, बोर व सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. तर, ४८ अभयारण्ये असून ४ संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. व्याघ्र प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने वाघांनी नवा कॉरिडॉर शोधला असून नजीकच्या राखीव जंगलाच्या दिशेने त्यांनी मुक्काम हलविल्याने मानव-वन्यजीव संघर्ष होत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढलेली आहे. विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू होत आहे, ज्यात नैसर्गिक मृत्यू, दोन वाघांमधील संघर्ष आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे अनैसर्गिक मृत्यू, शिकार, अपघात, विद्युतधक्का आदींचा समावेश आहे. मानव-वन्यजीव संघर्ष या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत. मानवी वस्तीजवळ फिरणा-या वाघांवर लक्ष ठेवणे, त्यांना पुन्हा जंगलात सोडणे आणि लोकांना यासंदर्भात जागरूक करणे, ही प्रक्रिया निरंतर सुरूच असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी यांनी दिली.