पुणे : वाघोली पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने केवळ ३० तासांत खून प्रकरणातील तीन सराईत आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अक्षय बाबु पटेल (२४, रा. खराडी), मयुर रामकिसन वडमारे (२२, रा. चंदननगर) आणि प्रदीप रघुनाथ जाधव (२३, रा. खराडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे वाघोली येथील उबाळेनगर परिसरातील कृष्णा लॉजच्या पार्किंगमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादातून बादल शेख नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला. त्याचे मित्र अक्षय पटेल, मयुर वडमारे आणि प्रदीप जाधव यांनी त्याच्यावर लोखंडी हत्यार व दगडांनी हल्ला करून डोक्यात ठेचून खून केला. या घटनेनंतर वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना आरोपी खराडी व दापोडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. तत्काळ सापळा रचून तपास पथकाने आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बागल, अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे यांनी सहभाग घेतला.