Shambhuraj Desai : निवडणुकीपुरते आठवण काढणाऱ्यांनी आमची काळजी करू नये; धनगर समाज शंभूराज देसाईंच्या पाठीशी”

कोयनानगर : पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत रस्ता, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध करून धनगर समाजाला विकास प्रवाहात सामील करण्याचे काम पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. त्यामुळे धनगर समाजाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाभिमुख नेतृत्वाला ठाम पाठींबा दिल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हावशी (ता. पाटण) येथे नुकतेच राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. तब्बल दहा कोटींच्या निधीतून उभारले जाणारे हे स्मारक धनगर समाजाच्या प्रगतीचे नवे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला. ही ऐतिहासिक उभारणी म्हणजे समाजाच्या उन्नतीला मिळालेली नवी दिशा असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
दरम्यान, पवनचक्की प्रकल्पाच्या काळात धनगर समाजाच्या जमिनी कवडीमोल दराने विकायला लावल्या गेल्या तर काहींनी स्वतःच्या जमिनी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिल्या. या अन्यायामुळे समाज भूमिहीन झाला असून चराऊ जागा कमी झाल्याने पाळीव जनावरांचा मृत्यू होऊन अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र त्यावेळी गप्प बसलेलीच मंडळी आज अफवा पसरवून समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप समाजबांधवांनी केला आहे.
धनगर समाज विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. “केवळ निवडणुकीपुरते आठवण काढणाऱ्यांनी आमच्या समाजाची काळजी करू नये. खोट्या अफवांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ,” असा इशारा भागोजी शेळके, लक्ष्मण झोरे, विकास झोरे, लक्ष्मण येडगे, रघुनाथ दंडीले, तानाजी खरात, रामभाऊ यमकर, धनाजी शेळके, सुशांत शिंदे, जोतिबा बावधाने यांनी दिला आहे.





