Nilesh Rane : “आयुष्यभर ज्यांनी तिरस्कार केला, आज ते ‘हिट विकेट’ झाले”; निलेश राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
Nilesh Rane : राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही - निलेश राणे

Nilesh Rane : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनबाई गिरीजा राऊत यांनी सासरच्या मंडळींकडून सातत्याने शारीरिक, मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला. याप्रकरणी राऊत कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यरात्री एका भोंदू बाबासह दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणावरून आता विनायक राऊत यांचे कट्टर राजकीय विरोधक कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना आमदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला. “आयुष्यभर ज्यांनी राणे कुटुंबाचा तिरस्कार केला, त्यांची सातत्याने बदनामी केली, ते आज स्वतःच्याच कर्माने ‘हिट विकेट’ झाले आहेत,” असा टोला निलेश राणे यांनी नाव न घेत विनायक राऊत यांना लगावला.
पुढे निलेश राणे म्हणाले, “गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, त्यांची समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे नको त्या यंत्रणा लावण्याचा उद्योग केला. एखाद्या बद्दल किती वाईट करायचे, याला काही मर्यादा असते की नाही? पण आज बघा, आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करावे लागले नाही, तर नियतीनेच त्यांना असा काही धडा शिकवला आहे की ते स्वतःच आपल्या घरातून ‘हिट विकेट’ झाले आहेत.”
आपल्या भाषणात पुढे बोलताना निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या राजकारणाचा दाखला दिला. राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. तसेच नियती कोणालाही माफ करत नाही, म्हणूनच सांगतो की राणेंशी नेहमी चांगले राहा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे.
विनायक राऊत यांच्या सूनेचे आरोप काय आहेत?
गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाने आपला छळ केला, तसेच अघोरी कृत्य करून मानसिक त्रास दिल्याच्या आरोप केला आहे. पती गितेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसतानाही ही गोष्ट लपवून लग्न लावून देण्यात आले. लग्न ठरवताना मोठ्या बंगल्याचे खोटे चित्र दाखवले गेले, मात्र लग्नानंतर त्यांना वाकोला येथील झोपडपट्टीतील घरात राहावे लागले.
मुलबाळ व्हावे म्हणून २०१८ ते २०२२ या काळात कुटुंबाने भोंदू बाबाच्या माध्यमातून अनेक अघोरी इलाज केले. यादरम्यान माझ्या डोक्यावरचे केस कापण्यात आले आणि इच्छेविरुद्ध बळजबरीने गोमूत्र पाजण्यात आले, मुलाचं शारिरीक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बरबाद केल्याचे त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले
याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आणि कुटुंबावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित किंवा खोटे असल्याचे त्यांनी सूचित केले असले, तरी त्यांची सून गिरिजा आपल्या आरोपांवर ठाम आहे.
हेही वाचा:
Pune Police: पुणे पोलीस दलात २११ पीएसआयची पदे रिक्त; ४० नवीन चौक्यांचा आराखडा कसा यशस्वी होणार?






