Chhagan Bhujbal – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मातोश्री निवासस्थानालाच तात्पुरते तुरुंग घोषित करण्याची सरकारची योजना होती, असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यामुळे निवृत्त आयपीएस अधिकारी के.पी. रघुवंशी यांच्यातील शाब्दिक युद्ध आता एका नव्या वळणावर आले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपली बाजू स्पष्ट केली. भुजबळ म्हणाले, ठाकरेंच्या विरोधातील फाईल ही तत्कालीन पोलीस आयुक्त एम.एन. सिंग यांनीच पाठवली होती. ही पूर्णपणे श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आधारित कायदेशीर प्रक्रिया होती, त्यामुळे वैयक्तिक दबावाचा प्रश्नच येत नाही. याबाबत पोलीस आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की बाळासाहेबांना कोणताही त्रास होऊ नये. पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करू नये, असेही सांगण्यात आले होते. तसेच तांत्रिक कारणांमुळे बाळासाहेबांना जामीन नाकारला गेलाच, तर त्यांना सामान्य तुरुंगात न नेत्या त्यांच्या मातोश्री बंगल्यावरच नजरकैदेत ठेवावे आणि त्या घरालाच तात्पुरते जेल घोषित करावे, अशी सरकारची योजना होती. बाळासाहेबांच्या सन्मानाला धक्का लागू नये हीच त्यामागची भावना होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, निवृत्त अधिकारी के.पी. रघुवंशी यांनी जितेंद्र दीक्षित लिखित ट्रबलशूटर पुस्तकात असा दावा केला आहे की, जे ते विशेष टास्क फोर्सचे (एसटीएफ) सदस्य होते, तेव्हा छगन भुजबळ त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंना पुराव्याशिवाय अटक करण्यासाठी सतत दबाव टाकायचे. इतकेच नाही तर भुजबळ आपला अपमानही करायचे, असा आरोप रघुवंशी यांनी केला आहे.