“केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असून संविधानाच्या न्यायासाठी मोठा लढा द्यावा लागेल”; संजय राऊतांची केंद्रावर जोरदार टीका

मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव असून संविधानाच्या रक्षणासाठी आपल्याला मोठा लढा द्यावा लागेल, असे विधान राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता हे कुणापासूनही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. विरोधीपक्षातील कोणताही नेता देशाच्या हिताबाबत प्रश्न विचारतो किंवा रस्त्यावर उतरतो, त्या सर्वांचा आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. मग त्यात सोनिया गांधी असो, राहुल गांधी असो वा संजय राऊत असो, जो प्रश्न विचारतो, त्याला चौकशीसाठी बोलावलं जातं. दहशत निर्माण केली जाते. तुरुंगात पाठवलं जातं. पण आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार आहोत.”
“केंद्रीय तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आहे. जे सरकारच्या विरोधात उभे आहेत, जे महाराष्ट्रात महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, संविधानाच्या सत्य आणि न्यायासाठी आम्हाला मोठा लढा द्यावा लागेल” असेही राऊत म्हणाले.
दरम्यान राऊत यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबाबत द्रौपदी मूर्मू यांचे अभिनंदन केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भारत देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मूर्मू निवडून आल्या याबद्दल सर्वांना आनंद आहे. कारण एक तळागाळातल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपतीसारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होताना, हे पाहून आम्हाला आनंद होतोय. त्यांच्या विजयात आमचा खारीचा वाटा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.





