रांची: आपण देशात कुठेही हिंदी लादण्याची मागणी केली नसून दुसऱ्या भाषेच्या वापराचाच आग्रह धरलेला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. हिंदीबाबत भाष्य केल्यामुळे निर्माण झालेला वाद मिटवण्याच्या प्रयत्नात बुधवारी शहा यांनी हे स्पष्टीकरण दिले. प्रादेशिक भाषा बळकट करण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करीत असल्याचेही शहा म्हणाले.
“मीसुद्धा बिगर हिंदी भाषेच्या राज्यातील आहे. गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते. हिंदी बोलली जात नाही, टीका करण्यापूर्वी माझे भाषण काळजीपूर्वक ऐकावे लागेल. भारतीय भाषा बळकट केल्या पाहिजेत आणि भारतीय भाषांची आवश्यकता लोकांना समजली पाहिजे, असेच आपण म्हणालो असल्याचे शहा यांनी सांगितले. एका हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शनिवारी हिंदी दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी देशभरात समान भाषेचा जोरदार आग्रह धरला होता. मात्र अशा प्रकारे हिंदी लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नास दक्षिणेतील पक्षांकडून जोरदार विरोध झाला होता. त्यावरून शहा यांनी हे स्पष्टीकरण दिले.
एखाद्या मुलाची योग्य मानसिक वाढ मातृभाषेतून शिक्षण घेतल्यासच होते. मातृभाषेचा अर्थ हिंदी नाही. तर एखाद्या विशिष्ट राज्याची प्रादेशिक भाषा असा आहे. परंतु येथे एक समायिक भाषाही असावी. देशात जर एखाद्याला दुसरी भाषा शिकायची असेल तर ती हिंदी असावी, अशी केवळ विनंती आपण केली होती. मात्र त्यात काय चुकीचे आहे, असे आपल्याला कळत नसल्याचेही शहा म्हणाले.