Totalizer system: …तर बूथचा निकालही गोपनीय हवा! ‘टोटलायझर’ यंत्रणेचा वापर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत
Totalizer system: अनेक केंद्रांची एकत्रित मतसंख्या जाहीर व्हावी

पुणे – मतदान करताना मतदाराने कोणाला मतदान केले, याची गोपनीयता राखली जाते. त्याच धर्तीवर मतदानानंतरही कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, याची माहिती गोपनीय ठेवण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
यासाठी टोटलायझर यंत्रणेचा वापर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, यामुळे वैयक्तिक मतदान केंद्राचा निकाल जाहीर न होता अनेक केंद्रांची एकत्रित मतसंख्या जाहीर होणार आहे.
ईव्हीएमपूर्वी मतपत्रिकेवर मतदान होताना विविध मतदान केंद्रांवरील मतपत्रिका एकत्र करून मतमोजणी होत होती. त्यामुळे एखाद्या विशिष्ट गावातून किंवा मतदान केंद्रातून कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, याची स्वतंत्र आकडेवारी समजत नव्हती.
लोकसभा, विधानसभा, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सध्या मतमोजणी करताना प्रत्येक मतदान केंद्रनिहाय उमेदवाराला मिळालेली मते जाहीर होतात. त्यामुळे कोठून, किती मतांचे मताधिक्य मिळाले, याची माहिती राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मिळते. याच आकडेवारीचा वापर अनेकदा विकासकामांसाठी निधी वाटपात दुजाभाव करण्यासाठी होत असल्याचा आरोप होत आहे.
टोटलायझर मशिनद्वारे सुमारे १४ मतदान केंद्रांचे कंट्रोल युनिट्स एकाच वेळी केबलने जोडले जातात. यामुळे वैयक्तिक बूथचे निकाल न दाखवता, त्या १४ बूथची एकत्रित एकूण मते दाखवली जातात. यामुळे विशिष्ट भागातील मतदारांनी कोणाला मतदान केले, हे उमेदवारांना समजत नाही.
मताधिक्यानुसार विकासाचा हिशेब?
निवडणुकीत मतदारांनी कोणाला मतदान केले, याची माहिती गोपनीय राहते. मात्र, मतदान केंद्रनिहाय निकालामुळे त्या केंद्रातील मतदारांनी कोणत्या उमेदवाराला किती मतदान केले, याचा अंदाज सहज बांधता येतो. त्यामुळे मतदारांनी दिलेला कौल हा पुढील काळातील विकासकामांवर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
हा प्रकार लोकशाहीतील समानतेच्या तत्त्वाला बाधक ठरू शकतो. त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी संपूर्ण मतदारसंघाचा समान विकास करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मतदानानंतरही गोपनीयता हवी!
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, की मतमोजणीनंतरही मतदानाची गोपनीयता राखण्याची आवश्यकता असून, सध्या मतदान केंद्रनिहाय उमेदवारांना किती मते मिळाली, याची आकडेवारी उपलब्ध होत असल्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून विकासकामांमध्ये दुजाभाव होण्याची शक्यता असते. जेथून मताधिक्य मिळाले, त्या भागाकडे विशेष लक्ष देण्याचे प्रकार घडतात. सर्व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि सर्व मतदारांना समान वागणूक मिळण्यासाठी मतदान केंद्रनिहाय निकालाची गोपनीयता राखणे आवश्यक आहे.





