Nitesh Rane : ….तर ईदलाही डीजे बंद झाला पाहिजे; नितेश राणेंची रोखठोक भूमिका
Nitesh Rane : आता काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने मिरवणुकांमधील डीजेचा मुद्दा आणखी तापणार आहे.

Nitesh Rane : सण-उत्सवांमधील डीजेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला सणांच्या मिरवणुकांमध्ये डीजेला परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत डीजेवर बंदीची मागणी केली जात आहे.
नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात पुण्यातील काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने मिरवणुकांमधील डीजेचा मुद्दा आणखी तापणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी डीजे बंदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एका मुलाखतीत बोलताना नितेश राणे यांनी हिंदू सणांवरून होणाऱ्या चर्चेवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “आमच्या हिंदू धर्माच्या संतांबद्दलच का बोललं जातं? आमच्या सनातन हिंदू धर्माला बदनाम का केलं जातं? आमच्या सणांमध्ये भीतीचं वातावरण का निर्माण केलं जातं? हिंमत असेल तर ईदच्या आधी बोलून दाखवा.”
तसेच दांडिया आणि गरबा कार्यक्रमांमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा, याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. “हिंदूंच्या सणांना का बदनाम केलं जातं? मुस्लिमांच्या कार्यक्रमात इतरांना परवानगी नसते, त्याचप्रमाणे दांडियाच्या कार्यक्रमातही मुस्लिमांना परवानगी नको.” असं नितेश राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘जिहादी’ असा उल्लेख करत काही गंभीर आरोपही केले. “जिहादी गरब्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी कोणतंही नाव सांगतो.” असा दावा त्यांनी केला. तसेच डीजेमुळे त्रास होत असेल आणि सणांमध्ये डीजेवर बंदी घालण्याची मागणी होत असेल, तर ही बंदी सर्वच धर्मांच्या सणांना लागू झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
‘हिंदू सणांना डीजे बंद असेल तर ईदेलाही बंद करा’
डीजे बंदीच्या मागणीबाबत बोलताना नितेश राणे यांनी थेट सवाल उपस्थित केला. “डीजे ईदला वाजत नाही का? सगळ्यांची भावना असेल की डीजे बंद झाला पाहिजे, तर आदरणीय फडणवीस साहेबांनी सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करण्याची भूमिका मांडली आहे. हिंदू सणांच्या वेळी डीजे बंद होत असेल तर ईदेलाही बंद झाला पाहिजे. ईदच्या जुलूसमध्येही डीजे वाजवता कामा नये.” असे नितेश राणे म्हणाले.
याशिवाय हिंदू धर्मावर सातत्याने टीका केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी इस्लाम आणि कुराणबद्दलही बोलण्याचे आव्हान दिले. “सगळे सल्ले हिंदू धर्मालाच दिले जातात. त्यापेक्षा इस्लाम आणि कुराणबद्दल बोलण्याची हिंमत करा. अशी हिंमत आमच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती.”
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची ही भूमिका राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटवते आणि इतर पक्षांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.






