नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावहून गावात येणाऱ्या व्यक्तींना गावातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी कडक भूमिका घेत बाहेरगावहून गावात आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरपंचांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अहमदनगर शहरासह तालुक्यात सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. विशेषतः बाहेरगावहून ग्रामीण भागात येत असलेले व्यक्ती करोनाबाधित असल्याचे आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर तहसील कार्यालय यांचेमार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार करोना विषाणू या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणुन गावपातळीवर ग्रामस्तरीय सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. त्यासाठी समितीच्या अध्यक्षपदी सरपंचाची नेमणुक करण्यात आहे. व त्यांना करावयाचे कामकाजाबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले.
त्यानुसार परराज्यातुन व परजिल्ह्यातून आलेली व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरण करणेबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र, याकडे काही सरपंच दुर्लक्ष करत असून त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.