नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सामान्य माणसाच्या स्वयंपाक घरासाठी सरते वर्ष (2022) आनंददायी नव्हे; तर यातनादायी ठरल्याची टिप्पणी खर्गे यांनी केली.
सरते वर्ष भारताच्या दृष्टीने चांगले ठरले. भारताने स्वत:साठी जगात विशेष स्थान निर्माण केले, अशी भूमिका मोदींनी नुकतीच मन की बात या कार्यक्रमातून मांडली. त्याचा संदर्भ घेऊन खर्गे यांनी ट्विटरवरून मोदींना प्रत्युत्तर दिले. एका वर्षात गॅस सिलिंडर 200 रूपयांनी महागला.
वर्षभरात दुधाच्या दरात सरासरी 10 रूपयांची वाढ झाली. तूरडाळ 10 रूपयांनी महागली. खाद्यतेलाचे दर 15 ते 20 रूपयांनी वाढले. एका वर्षात पीठ 25 टक्क्यांनी महागले, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची चौकशी – उपमुख्यमंत्री फडणवीस
महागाईच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सातत्याने मोदी आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. आता वर्ष सरताना पुन्हा तो मुद्दा उपस्थित करत खर्गे यांनी मोदींना लक्ष्य केले.