सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच विचार केल्याचे दिले कारण
नवी दिल्ली- लोकसभा निवडणूकीच्या 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान “व्हीव्हीपॅट’च्या स्लीपांबरोबर 100 टक्के पडताळणी करण्यात यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली. या संबंधीच्या मागणीवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने यापूर्वीच विचार विनिमय केला आहे, असे सुटीकलीन न्यायालयाने सांगितले.
सरन्यायाधीशांनी यापूर्वीच या विषयावर मतप्रदर्शन केले आहे. मग सुटीकालीन दोन न्यायाधीशांच्या पिठापुढे हा विषय पुन्हा का उपस्थित केला गेला आहे, असा सवालही न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम. आर. शाह यांच्या न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला आणि या प्रकरणावर सुनावणीला परवानगी नाकारली.
चेन्नईमधील “टेक फॉर ऑल’ या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली होती. निवडणूक यंत्रणेबाबत पूर्ण समाधान होण्यासाठी व्हीव्हीपॅटमधील स्लीपांची ईव्हीएममधील मतांबरोबर 100 टक्के पडताळणी केली जावी, अशी मागणी या याचिकेत केली गेली होती.