मुंबई: भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीच्या सत्राला सोमवारी, १२ जानेवारी रोजी अखेर पूर्णविराम मिळाला. सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण अनुभवल्यानंतर बाजाराने जबरदस्त रिकव्हरी केली आणि सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणावर बंद झाले. व्यवहारअखेर बीएसई सेन्सेक्स ३०२ अंकांच्या म्हणजेच ०.३६ टक्क्यांच्या वाढीसह ८३,८७८ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी १०७ अंकांनी वधारून २५,७९०.२५ वर स्थिरावला. बाजारातील या अचानक आलेल्या तेजीचे मुख्य कारण भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांचे एक सकारात्मक विधान ठरले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराबाबत (Trade Deal) त्यांनी दिलेल्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. या विधानानंतर मेटल, ऑईल अँड गॅस, पीएसयू बँक आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये खालच्या स्तरावरून जोरदार खरेदी झाली. मात्र, दुसरीकडे रिअल्टी, फार्मा आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने आजचा दिवस फायदेशीर ठरला असून बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४६८.९६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत आज सुमारे १.२२ लाख कोटी रुपयांची भर पडली. सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्स आज वाढीसह बंद झाले, ज्यामध्ये टाटा स्टील २.७५ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी राहिला. त्यापाठोपाठ एशियन पेंट्स, ट्रेंट आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली. एकीकडे मुख्य निर्देशांकात तेजी असली तरी ब्रॉडर मार्केटमध्ये मात्र आजही दबाव पाहायला मिळाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४१ आणि ०.६८ टक्क्यांनी घसरून बंद झाले. आज दिवसभरात एकूण ४,४८५ शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यापैकी २,७२० शेअर्स घसरणीसह बंद झाले तर १,५७० शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. विशेष चिंतेची बाब म्हणजे, आज ५३२ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला, तर केवळ ८२ शेअर्सनी आपला उच्चांकी स्तर गाठण्यात यश मिळवले.