मुंबई – राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ताबडतोब मदतकार्य सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना याविषयी सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेला आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे. त्यातील जिरायत शेतकऱ्यांना पन्नास हजार व बागायत शेतकऱ्यांना एक लाख रुपायांची मदत करावी. तसेच आज इंदूर-अमळनेर एसटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तत्काळ प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
वीज बिल दरवाढ केल्याबद्दल जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 20 टक्के दरवाढ सामान्य जनतेला न परवडणारी आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून लोकांना दिलासा दिला असे दाखविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. पण तो दिलासा वीजेचे दर वाढवून हिरावून घेण्याचे काम सरकारने केले अशी टीका त्यांनी केली. तसेच मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेली कामे व नव्याने मान्य केलेल्या कामांना नव्या सरकारने स्थगिती दिली आहे. या विकासकामांवरील स्थगिती उठविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आणि याच्याशी निगडीत घटनात्मक पेचासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय खंडपीठ नेमले आहे. पक्षांतरबंदी कायदा आणि विधानसभेचे नियम पायदळी तुडवून जर कुणी सत्तेत येत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील आष्टी-पाटोदा या भागात कृष्णेचे पाणी पोहचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रीतसर निविदा निघालेल्या आहेत. मराठवाड्याला पाणी मिळावे, अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका होती. मात्र मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका नव्या राज्य सरकारची असेल तर लोकांनाही त्यांची भूमिका कळून येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.